Sonam Wangchuk: “…अजूनही माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?”; ‘डिल’ केल्याच्या आरोपांवर सोनम वांगचूक यांचे सडेतोड उत्तर
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांनी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी भाजप नेते जेपी नड्डा यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतले

Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटीविरोधात तब्बल 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतले. मात्र सरकारसोबत डिल केल्याचे आरोप त्यांच्यावर होऊ लागले. हे सर्व आरोप फेटाळत त्यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. (Sonam Wangchuk)
उपोषण संपवल्यानंतर वांगचूक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यात त्यांनी “26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला आंदोलनाबद्दल प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर सरकारशी तडजोडच करायची असती, तर इतके दिवस उपोषण करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता,” असे प्रत्युत्तर सोनम वांगचूक यांनी टीका करणाऱ्यांना दिले आहे.
AFTER 26 DAYS OF HUNGER DO I NEED TO PROVE MY SINCERITY !!!
Do please watch and help spread the word. Find the full 22 minutes video on my YouTube Channel: Sonam Wangchuk pic.twitter.com/6CO3tjZsSD— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 24, 2026
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये, सोनम वांगचुक यांनी सरकारसोबत तडजोड केल्याच्या दाव्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये सोनम वांगचूक यांनी म्हंटले की, “विद्यार्थ्यांसाठी २६ दिवस उपोषण केल्यानंतर, ११ किलो वजन कमी झाल्यावर आणि लडाखच्या प्रचंड थंडीतून थेट दिल्लीच्या कडक उन्हात हे सर्व सहन केल्यानंतर, माझं उपोषण किती पवित्र होते, मी ते कोणाच्या हातून सोडलं किंवा मी काही तडजोड केली की नाही, याचे चारित्र्य प्रमाणपत्र मला कोणाकडून घेण्याची गरज आहे का?”
‘अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणाऱ्या देशाला लाज वाटायला हवी’ (Sonam Wangchuk)
सोनम वांगचुक पुढे म्हणाले, “मी जर माझे उपोषण सोडलं, तर तो कोणासोबत सोडलं? मी त्यांच्यासोबतच का सोडलं, मी ह्या व्यक्तीसोबत का नाही सोडलं? काय सौदा झाला होता? मला या सगळ्याची उत्तरे द्यावी लागतील. कालपासून मी फक्त द्रव पदार्थ खात आहे, ज्यामुळे मला थोडी ऊर्जा मिळाली आहे. सकाळपासून लोक मला फोन करत आहेत किंवा पोस्ट दाखवत आहेत, आणि म्हणत आहेत, तुमच्याबद्दल खूप प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुम्ही केंद्रीय मंत्र्यांकडून उपवास का सोडला? तुम्ही दुसऱ्या कोणाकडून का नाही सोडला?”
जर मला सौदा करायचा असता, तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असते का? किती लोकांनी असे सौदे केले आहेत? ते असेच सौदे करतात का? आलिशान खोल्यांमध्ये बसून सौदे केले जातात. अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणाऱ्या देशाला लाज वाटायला हवी, जिथून असे नीच विचार जन्माला येतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
वांगचुक यांचे आवाहन (Sonam Wangchuk)
“मी कोणालाही दोष देत नाही, कारण तुमच्यापैकी बहुतेकांना मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आहे याची कल्पना नाही. गेल्या १-२ आठवड्यांत माझं कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेलं आहे, हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे कोणाचेही ऐकण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी नक्की पाहा. त्यांच्या मनात काही आकस आहे का? ते अशा एखाद्या राजकीय पक्षाचे आहेत का ज्यांचे दुसऱ्या पक्षाशी वैमनस्य आहे, की ते एक निष्पक्ष व्यक्ती आहेत? जर ते निष्पक्ष असतील, तर नक्कीच त्यांचं ऐका” असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी, सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी रात्री उशिरा भाजप नेते जेपी नड्डा यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतले.
हेही वाचा:





