Indrayani River Pollution: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली! स्नानासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Indrayani River Pollution: औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रियेविना सोडलेले रासायनिक सांडपाणी नदीत मिसळत असल्याचा स्थानिकांचा आरोप; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी.

Indrayani River Pollution – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आळंदी येथील इंद्रायणी नदीचे पाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात फेसाळल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वारकरी भाविकांमध्ये जलप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 2 जुलै रोजी सायंकाळी आळंदीतील सिद्धबेट परिसरातील बंधार्याखालील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढरा फेस तरंगताना दिसून आला.
नदीच्या पाण्यावर शुभ्र फेसाचे थर पसरल्याने परिसरातील नागरिकांनी जलप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, इंद्रायणी नदीकाठावरील काही गावांतील सांडपाणी तसेच औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक मिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नदी वारंवार फेसाळत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराची संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
नदीतील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम नदीकाठच्या कुपनलिकांवर तसेच या नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता वाढली आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच प्रदूषणास जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीनेही या संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
तीर्थ म्हणून प्राशन
आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक आळंदीत दाखल होणार असून, अनेक भाविक इंद्रायणी नदीत स्नान करतात. काही भाविक नदीचे आचमनही करतात. अशा परिस्थितीत प्रदूषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



