Women’s Asia Cup 2024 : भारताचा सलग दुसरा विजय, युएईचा 78 धावांनी पराभव करत गाठली उपांत्य फेरी…

Women’s Asia Cup T20 2024 (IND W vs UAE W) : श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया कप 2024 मध्ये आज भारताचा सामना युएईविरुद्ध झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यूएईचा 78 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारत 23 जुलै रोजी नेपाळ विरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळणार आहे. यूएईविरुद्धच्या विजयासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. भारताच्या खात्यात चार गुण आहेत आणि +3.386 चा निव्वळ रन रेट आहे. महिला आशिया कप टी-20 2024 मध्ये भारताने सलग दुसरा सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.
डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 20 षटकात 5 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूएईला 20 षटकांत 7 विकेट गमावून 123 धावा करता आल्या आणि भारताने हा सामना 78 धावांनी जिंकला. ऋचा घोष या सामन्याची मानकरी ठरली.
For her blistering counter-attacking knock of 64* off 29 balls, @13richaghosh is named the Player of the Match 👏
Scorecard ▶️ https://t.co/fnyeHav1sS#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvUAE pic.twitter.com/YAOm2a9gDA
— BCCI Women (@BCCIWomen) July 21, 2024
विजयासाठी 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूएईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिला धक्का बसला तो 11 धावांवर. रेणुका सिंगने तीर्थ सतीशला बाद केले. तिला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिनिथाला पूजाने बाद केले. तिला फक्त सात धावा करता आल्या. यानंतर समायरा पाच धावा करून बाद झाली. या सामन्यात सलामीवीर ईशा ओजाने 36 चेंडूत 38 धावांची खेळी केली. तर खुशी 10 धावा करून, हीना आठ धावा करून आणि रितिका सहा धावा करून बाद झाली. तर, कविशा 40 धावा करून नाबाद राहिली. या खेळीत तिने 32 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
टीम इंडियासाठी दीप्ती शर्माने गोलंदाजीत आपली ताकद दाखवली. तिने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका सिंगने 4 षटकात 30 धावा देत 1 बळी घेतला. तनुजा कंवरने 4 षटकात 14 धावा देत 1 बळी घेतला. पूजाने 4 षटकात 27 धावा देत 1 बळी घेतला. राधा यादवनेही एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, यासामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. भारतीय महिला संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी झाली. कविशाने उपकर्णधार मंधानाला रिनीता राजीथच्या हातून झेलबाद केले. गेल्या सामन्यात 45 धावांची स्फोटक खेळी खेळणाऱ्या या स्टार फलंदाजाला केवळ 13 धावा करता आल्या. मात्र शफालीने 37 धावांची शानदार खेळी केली. 18 चेंडूंचा सामना करताना तिने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दयालन हेमलताला केवळ दोन धावा करता आल्या.
यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी पदभार स्वीकारला. चौथ्या विकेटसाठी दोघींमध्ये 54 धावांची भागीदारी झाली जी 12व्या षटकात कविशाने मोडली. जेमिमा 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचवेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋचा घोषने दमदार कामगिरी करत कर्णधारासोबत 75 धावांची भागीदारी केली. 19.1 षटकात संघाची धावसंख्या 181 असताना हरमनप्रीत कौर 47 चेंडूत 66 धावांची स्फोटक खेळी करून बाद झाली. तिने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान तिने सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी यष्टीरक्षक फलंदाज घोष हिनं 29 चेंडूंचा सामना करत 64 धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान तिने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. पूजा वस्त्राकर आणि ऋचा यांच्यात 20 धावांची नाबाद भागीदारी झाली. विशेष म्हणजे पूजा वस्त्राकर नाबाद राहिली, तिला खातेही उघडता आले नाही.
Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव…
यूएईकडून गोलंदाजीत कविशाने 2 बळी घेतले. तिने 4 षटकात 36 धावा दिल्या. हीनाने 4 षटकात 40 धावा देत 1 बळी घेतला. समायराने 4 षटकात 42 धावा देत 1 बळी घेतला. याशिवाय कोणालाही विकेट मिळाली नाही. कर्णधार ईशाने 2 षटकात 26 धावा दिल्या.





