India Injury Blows : टीम इंडियाला डबल झटका! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी ‘हे’ दोन हुकमी एक्के दुखापतीमुळे बाहेर
India Injury Blows : या अत्यंत महत्त्वाच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचे दोन मोठे झटके बसले आहेत.

India Injury Blows ahead IND vs ENG ODI Series Harshit Rana and Varun Chakaravarthy Injured : १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार सुरू होणार आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचे दोन मोठे झटके बसले आहेत. संघातील युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.
बीसीसीआयने तातडीने हर्षितच्या जागी प्रिन्स यादवला संघात सामील केले आहे. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दुखापतग्रस्त झालेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा देखील आगामी झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर झाला असून, त्याच्या जागी लेग स्पिनर रवि बिश्नोईला संघात संधी देण्यात आली आहे.
हर्षित आणि वरुणला ‘हॅमस्ट्रिंग’ची गंभीर दुखापत –
🚨 News 🚨
Prince Yadav and Ravi Bishnoi named as replacements for injured Harshit Rana and Varun Chakaravarthy in #TeamIndia‘s squads for #ENGvIND ODIs and #ZIMvIND T20Is, respectively.
More details 🔽https://t.co/xOPGYDaugn
— BCCI (@BCCI) July 12, 2026
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान या दोन्ही भारतीय खेळाडूंना दुखापत झाली होती, ज्यामुळे ते शेवटच्या दोन टी-२० सामन्यांनाही मुकले होते. वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या उजव्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली असून त्याला ‘ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग इंजरी’चे निदान झाले आहे. त्यामुळे तो वनडे मालिकेला मुकणार आहे. तर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या डाव्या पायाच्या स्नायूंमध्ये गंभीर ताण आल्याने त्याला ‘ग्रेड-२ हॅमस्ट्रिंग इंजरी’ झाली आहे. या गंभीर दुखापतीमुळे तो झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. हे दोन्ही खेळाडू आता उपचारासाठी बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये जाणार आहेत.
प्रिन्स यादवची एन्ट्री; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी श्रेयसकडे धुरा
हर्षितच्या जागी संधी मिळालेला वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यापूर्वी आयर्लंडविरुद्ध टी-२० आणि अफगाणिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले आहे. निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. दरम्यान, महिन्याच्या शेवटी होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरला कर्णधार आणि तिलक वर्माला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
या दौऱ्यात वरुण चक्रवर्तीच्या जागी रवि बिश्नोईच्या पुनरागमन झाल्याने भारतीय फिरकी फळी मजबूत झाली आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ कसा खेळ करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





