IND vs PAK Video : भारत-पाक सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ
IND vs PAK Video : या व्हिडिओमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या महिला खेळाडू थेट मैदानावरच एकमेकांवर हात उचलत आणि भिडताना दिसत आहेत.

IND W vs PAK W AI Fake Video Fight Truth : महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत रविवारी भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी दारूण पराभव करत देशात मोठा जल्लोष साजरा केला. मात्र, या ऐतिहासिक सामन्यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओने एकच खळबळ माजवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या महिला खेळाडू थेट मैदानावरच एकमेकांवर हात उचलत आणि भिडताना दिसत आहेत. अवघ्या १० तासांत हा व्हिडिओ १० लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून क्रीडा जगतात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे ‘तो’ व्हायरल व्हिडिओ?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, फलंदाजी करत असलेल्या एका भारतीय खेळाडूजवळ पाकिस्तानची खेळाडू येते आणि त्यांच्यात तीव्र वाद सुरू होतो. हा वाद इतका विकोपाला जातो की, दोघी एकमेकींवर थेट हात उचलतात. त्यानंतर मैदानातील पंच आणि इतर खेळाडू धावत येऊन या दोघींना एकमेकांपासून वेगळे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त करत, मैदानावर खरोखरच अशी लाजिरवाणी घटना घडली का? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
व्हिडिओमागचं सत्य समोर –
Fighting between India & pakistan #indiapakistan pic.twitter.com/np1qORbbWo
— Spider (@SpiderAlert24) June 14, 2026
हा सामना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये किंवा टीव्हीवर पाहणाऱ्या चोखंदळ चाहत्यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा यामागील धक्कादायक सत्य समोर आले. हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट असून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून तयार करण्यात आला आहे. मैदानावर अशी कोणतीही हाणामारी झालेली नाही. नेटकऱ्यांनी व्हिडिओमधील खालील ढोबळ चुका शोधून हा व्हिडीओ खोटा असल्याचे सिद्ध केले आहे:
- जर्सीवरील गोंधळ: व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडूच्या जर्सीवर समोरच्या बाजूला लिहिलेले ‘Pakistan’ हे नाव चक्क पाठीमागच्या बाजूला दिसत आहे.
- नियमांची ऐशीतैशी: क्रिकेटच्या नियमांनुसार खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संघाचे २ खेळाडू असतात, मात्र या एआय व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे चक्क ३ खेळाडू क्रीझवर उभे असलेले दिसत आहेत. तसेच खेळाडूंच्या हालचाली अत्यंत कृत्रिम आहेत.
भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा –
या बनावट व्हिडीओ पलीकडे मैदानावर भारतीय महिला संघाने अप्रतिम खेळ दाखवला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत १७० धावांचे मजबूत आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०६ धावांवर गारद झाला. भारताची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा हिने ४ षटकांत अवघ्या १० धावा देत ५ बळी घेतले.





