IND vs SL 3rd ODI : गेल्या 27 वर्षांची बादशाहत संपुष्टात..! श्रीलंकेविरूध्दच्या तिसऱ्या वनडेत भारताचा दारुण पराभव, मालिकाही 2-0 ने गमावली…

IND vs SL 3rd ODI Match Result : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 110 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने मालिका 2-0 अशी खिशात घातली. दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. तर पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे भारताने 27 वर्षांनंतर प्रथमच श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली आहे. श्रीलंकेचा ड्युनिथ वेललागे या मालिकेचा मानकरी ठरला.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 249 धावाचे लक्ष्य ठेवलं होत. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ 26.1 षटकांत 138 धावांवरच संपुष्टात आला. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारताचे बहुतांश स्टार फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. चार फलंदाज सोडले तर अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली.
Innings Break! #TeamIndia restrict Sri Lanka to 248/7.
3⃣ wickets on ODI debut for @ParagRiyan
1⃣ wicket each for @Sundarwashi5, @imkuldeep18, @akshar2026 & @mdsirajofficialStay Tuned for our chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/Lu9YkAmnek #SLvIND pic.twitter.com/zrooQ0vaTO
— BCCI (@BCCI) August 7, 2024
रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने 20 चेंडूत 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर 30 धावा तर विराट कोहली 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटने 18 चेंडूंचा सामना केला आणि यादरम्यान 4 चौकार मारले. सलामीवीर शुभमन गिल 06 धावा , ऋषभ पंत अवघ्या 06 धावा, श्रेयस अय्यर 8 धावा तर अष्टपैलू खेळाडू शुभम दुबे 09 धावा, अक्षर पटेल 2 धावा, कुलदीप यादव 06 तर रियान पराग 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत ड्युनिथ वेललागेने 5.1 षटकात 27 धावा देत सर्वाधिक 5 बळी घेतले. तिक्षाना आणि वांडरसे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर असिथा फर्नांडोने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिसच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. एकवेळ श्रीलंकेचा संघ 280 ते 300 पर्यंत सहज जाईल असे वाटत होते, पण रियान परागने अप्रतिम गोलंदाजी करत सामन्याचे चित्र फिरवले. एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर 170 अशी होती. अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस क्रीजवर होते. श्रीलंकेचा संघ 280 धावांपर्यंत सहज पोहोचेल असे वाटत होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने चेंडू रियान परागकडे सोपवला.
पराननेही कर्णधाराला निराश केले नाही आणि तो येताच धोकादायक दिसत असलेल्या फर्नांडोला पायचीत (एलबीडब्ल्यू) आऊट केले. रियान पराग इथेच थांबला नाही. यानंतर त्याने चारिथ असलंका आणि दुनिथ वेल्लालाघे यांनाही बाद केले. पुन्हा एकदा श्रीलंकेची मधली फळी ढासळली आणि 1 बाद 170 वरून संघाला 50 षटकांत 248 धावांपर्यंतच मजल मारता आली.
श्रीलंकेकडून फलंदाजीत अविष्का फर्नांडोने 102 चेंडूत सर्वाधिक 96 धावांची शानदार खेळी केली. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. कुसल मेंडिसने 4 चौकाराच्या मदतीने 59 धावांची तर सलामीवीर पथुम निसांका याने 65 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर कामिंडू मेंडिस 19 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला.
27 वर्षांची बादशाहत संपुष्टात..
साल 1997 नंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने 1997 मध्ये भारताचा शेवटचा 3-0 असा पराभव केला होता. तेव्हापासून भारताने सलग 11 वेळा एकदिवसीय मालिका जिंकली होती, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा विक्रम कायम राखू शकला नाही आणि 27 वर्षांनंतर त्यांना श्रीलंकेकडून वनडे मालिका गमवावी लागली. या दौऱ्यावर भारताने टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली होती, मात्र एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला ही लय कायम ठेवता आली नाही. यासह भारताचा श्रीलंका दौरा संपला आहे.





