मुंबई – यजमान भारतीय संघ आजपासून श्रीलंकेशी तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज बनला आहे. या मालिकेला आज येथे होत असलेल्या पहिल्या लढतीने प्रारंभ होत असून संघात स्थान देण्यात आलेल्या नवोदितांना आपले स्थान भक्कम करण्याची नामी संधी लाभली आहे.
नव्या वर्षातील पहिलीच मालिका असली तरीही संघातून नियमित कर्णधार रोहित शर्मा, प्रमुख फलंदाज विराट कोहलीसह लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतलाही या मालिकेसाठी निवडलेल्या संघात स्थान देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे संघात इशान किशनचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यावरच आता संघाच्या भक्कम सुरुवातीची तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. संघात कसोटीपटूचा शिक्का बसलेल्या शुभमन गिलचाही समावेश करण्यात आला असल्याने त्याला आपण मर्यादीत षटकांच्या सामन्यांतही आक्रमक फलंदाजी करु शकतो हे दाखवण्याची सुवर्णसंधी आहे.
Kapil Dev | ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर कपिल देव यांचा युवा खेळाडूंना मोलाचा सल्ला
इशान किशन व गिलसह या संघात महाराष्ट्राचा भरात असलेला फलंदाज ऋतूराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांचीही वर्णि लागल्याने त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर यजुवेंद्र चहल व हर्षल पटेलही संघात परतल्याने त्यांनाही संघातील स्थान निश्चित करण्यासाठी चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे. नवोदितांमध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकसह शिवम मावी व मुकेश कुमारही असल्याने संघातील अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत त्यांनाही आपली गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे आहे.
Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 नाही खेळणार? समोर आली महत्वाची माहिती….
भरात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव संघात असल्याने भारतीय संघाची मधळी फळी भक्कम झाली आहे. मात्र, दीपक हुडाला सरस कामगिरी करावीच लागणार असून त्याला अपयश आले तर त्याचे संघातील स्थानही धोक्यात येणार आहे. त्यामनाने सलामीला किशनसह गिल डावाची सुरुवात करेल का ऋतूराजला अंतिम 11 खेळाडूंत संधी मिळेल हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वॉशिंग्टन सुंदर व अक्सर पटेल यांच्यात पटेलचेच पारडे जड राहणार आहे. त्याने बांगालदेशविरुद्धच्या मालिकेत सरस कामगिरी केल्यामुळे नवोदित कर्णधार हार्दिक पंड्या त्यालाच संधी देण्याची दाट शक्यता आहे.
पंड्याच्या कामगिरीकडेच लक्ष
भारताच्या टी-20 संघाचे कायमचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे येणार असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. त्यामुळे याही मालिकेत त्याच्या वैयक्तीक कामगिरीसह नेतृत्वातील कामगिरीवरही लक्ष राहणार आहे. तो अष्टपैलु खेळाडू असला तरीही आता त्याला आपण प्रस्थापित कर्णधारांपेक्षाही जास्त प्रगल्भतेने नेतृत्व करु शकतो व यशस्वीही होऊ शकतो हे दाखवण्याची नामी संधी मिळाली आहे.
आशियाइ विजेत्यांचे राहणार आव्हान
श्रीलंका संघ कादगावर कमकुवत दिसत असला तरीही याच संघाने यंदाची आशिया करंडक स्पर्धा जिंकलेली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ भारतीय संघाला होणार असला तरीही टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकते त्यामुळे ही मालिका रंगतदार ठरेल यात शंका नाही.