Rishabh Pant – ऋषभ पंतच्या गाडीला अपघात होणे हे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी दुःखद घटना आहे. या अपघातानंतर विविध स्तरातून त्याच्यासाठी हळहळ केली जात आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पंत दुखापतीतून लवकरात लवकर बरा व्हावा आणि मैदानावर पुन्हा पहिल्यासारखा खेळताना दिसावा, असे वाटत आहे. पंतची दुखापत पाहता तो आता आयपीएल २०२३ या पुढील हंगामात खेळणार की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता दिल्ली कपिटल्स संघाला तात्पुरता कर्णधार शोधावा लागणार हे नक्की आहे.
आयपीएलच्या हंगामासाठी शिल्लक राहिलेला कालावधी पाहता ऋषभ पंतचे खेळणे शक्य नसणार आहे. शुक्रवारी सकाळी पंतच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला तेथील स्थानिकांच्या साहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या अपघातात त्याच्या पाठीला जास्त दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर त्याच्या कपाळ, गुडघा, मनगट, घोट आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याची दुखापत ही गंभीर असून त्याला यातून पूर्णपणे सावरण्यासाठी जवळजवळ तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
ऋषभ पंत सहा महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यास आयपीएल २०२३ साठी दिल्ली कपिटल्सला नव्या कर्णधाराची आवश्यकता भासणार आहे. अशात संघातील डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे या दोघांपैकी एकाकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. पांडेला संघाने यंदाच्याच मिनी लिलावात खरेदी केले आहे. त्यामुळे वॉर्नरकडे नेतृत्व दिले जाण्याची जास्त शक्यता आहे. असे झाल्यास बऱ्याच कालावधीनंतर वॉर्नर एखाद्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. आयपीएल २०२१ मध्ये त्याला त्याच्या खराब कामगिरीमुळे कर्णधारपदावरून खाली बसवले. त्यानंतर २०२२ हंगामासाठी दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले होते.
भारतीय संघाचा धडाकेबाज आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. अपघातात काही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असल्याने पंतला बरा होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. “पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतील आणि जर ते गंभीर असेल तर त्याला जास्त वेळ लागू शकतो. पुढील मूल्यांकन त्याच्या दुखापतीच्या अहवालावर आधारित असू शकते,” असे डॉ. कमर आझम यांनी सांगितले आहे.