IND vs PAK : ‘तो सर्वांच्याविरुद्ध चालतो पण आमच्याविरुद्ध नाही…’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा सूर्याबद्दल दावा

Bazid Khan Comments on Suryakumar Yadav : आगामी आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बाझिद खान यांनी भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारताचे प्रमुख खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला मोठा फटका बसेल, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड फारसा चांगला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह –
पाकिस्तानच्या पीटीव्ही स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना बाझिद खान म्हणाले, “सूर्यकुमार यादवने जवळपास सर्वच संघांविरुद्ध धावा केल्या आहेत, परंतु पाकिस्तानविरुद्ध तो प्रभावी ठरलेला नाही. यामागे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे की अन्य काही कारण, हे सांगता येणार नाही, पण त्याचा फॉर्म पाकिस्तानविरुद्ध चांगला राहिलेला नाही.” सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारत 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे.
कोहली-शर्माची अनुपस्थिती खटकणार –
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने भारताला त्यांच्या अनुपस्थितीची मोठी किंमत मोजावी लागेल, असे बाझिद यांनी नमूद केले. ते म्हणाले, “विराट आणि रोहित हे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांच्यासारखी तीव्रता आणि क्षमता आमच्या (पाकिस्तान) संघात कोणाकडेही नाही. हे दोघे खेळात जोश आणि ताकद आणतात. त्यांच्या अनुपस्थितीमुळे भारताला निश्चितच फटका बसेल.”
हेही वाचा – Fareed Hussain Death : जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात मृत्यू, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
जडेजाच्या अनुपस्थितीची चिंता –
बाझिद यांनी रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “लोक विराट आणि रोहितबद्दल बोलतात, पण जडेजासारखा खेळाडू संघाला खऱ्या अर्थाने संतुलन देतो. अक्षर पटेल हा चांगला पर्याय आहे, पण जडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि विशेषतः क्षेत्ररक्षणातून संघाला अतुलनीय योगदान देतो. जडेजा हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम दोन क्षेत्ररक्षकांपैकी आहे.”
आशिया कपमधील भारत-पाक सामना –
आशिया कप 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होत आहे. यामध्ये 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित लढत रंगणार आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरणार असून, बाझिद खान यांच्या दाव्यांनंतर भारतीय संघ कसा प्रदर्शन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





