Ravichandran Ashwin & Ravindra Jadeja Create History : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात प्रत्येकी तीन बळी घेत इंग्लंडचा डाव 246 धावांपर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह ही जोडी भारताची कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज जोडी ठरली आहे. या प्रकरणात दोघांनी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीला मागे टाकले.
रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद करत त्यांची भंबेरी उडवली. याचबरोबर त्यांनी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. अश्विन आणि जडेजा यांनी मिळून भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाचा माजी कर्णधार व लेग स्पीन गोलंदाज अनिल कुंबळे आणि ऑफ स्पीन गोलंदाज हरभजन सिंग यांच्या नावावर होता.
अश्विन आणि जडेजाने इंग्लंडचे प्रत्येकी तीन बळी घेत 506 बळींची नोंद केली. यापूर्वी कसोटीत कुंबळे आणि हरभजनने मिळून सर्वाधिक 501 बळी घेतले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हरभजन आणि जहीर खान या जोडीचा समावेश आहे. त्यांनी भारतासाठी मिळून 474 बळी घेतले आहेत. अश्विन-उमेशची जोडी 431 विकेट्ससह चौथ्या स्थानावर असून कुंबळे-श्रीनाथची जोडी 412 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्या भारतीय गोलंदाजी जोड्या…
अश्विन/जडेजा : 506*
कुंबळे/हरभजन : 501
झहीर/हरभजन : 474
अश्विन/उमेश : 431
कुंबळे/श्रीनाथ : 412
दरम्यान, कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एक विकेट गमावून 119 धावा केल्या होत्या. भारत सध्या पहिल्या डावात 127 धावांनी मागे आहे आणि त्यांच्या 9 विकेट शिल्लक आहेत. यशस्वी जैस्वालने 70 चेंडूत 76 धावा केल्यानंतर तर गिल 14 धावा करून नाबाद राहिला. याआधी इंग्लंडचा डाव 246 धावांवर आटोपला होता. भारताकडून जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.