IND vs BAN : टीम इंडियाच्या घोषणेपूर्वी आली मोठी बातमी, कसोटी मालिकेत ‘या’ प्रमुख गोलंदाजाला मिळणार विश्रांती?

India vs Bangladesh Test Series 2024 : टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आता बातम्या येत आहेत की या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे.
अहवालात म्हटले आहे की, बुमराह 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करेल. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते कसोटी संघात डावखुरा सीम आणि स्विंग गोलंदाज आणून वेगवान गोलंदाजी आक्रमणात अधिक विविधता आणण्याची योजना आखत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “बुमराहला त्याच्या शरीराची आणि तंदुरुस्तीची चांगली जाणीव आहे आणि त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खेळायचे आहे की नाही हे त्याच्यावर अवलंबून असेल.जसप्रीत बुमराहने भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांमध्ये तंदुरुस्त राहावे, असे संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे स्पष्ट मत आहे. मात्र, या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात कदाचित तो खेळण्यास तयार असेल.”
बुमराहऐवजी असू शकतात ‘हे’ पर्याय…
बुमराहच्या जागी डाव्या हाताच्या स्विंग बॉलच्या गोलंदाजांचा पर्याय पाहिल्यास निवडकर्ते अर्शदीप सिंग आणि खलील अहमद यांच्या नावाचा विचार करू शकतात. अर्शदीप सतत टी-20 क्रिकेट खेळत आहे आणि आता कसोटी संघाचे दार ठोठावत आहे. टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. दुसरीकडे, खलील हा चांगला गोलंदाज असला तरी त्याच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल दुसरा पर्याय आहे, परंतु सध्या तो खलील आणि अर्शदीपला स्पर्धा देण्यात खूप मागे आहे.





