#CWC2023 #INDvAUS Final : विश्वचषकात भारताच्या पराभवाला जबाबदार कोण? काँग्रेस नेत्याने केला मोठा दावा…

Ajay Rai On ICC World Cup 2023 Final : यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी भारत-ऑस्ट्रेलिया (IND-AUS) विश्वचषक फायनलबाबत मोठे विधान केले आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, भाजपने संपूर्ण सामन्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मैदानात पोहोचले तेव्हा खेळाडूंना मानसिक दबावाचा सामना करावा लागला.
खेळाडू होते मानसिक दडपणाखाली..
ते म्हणाले की, खेळाडूंना पूर्णपणे मोकळीक द्यायला हवी होती आणि हेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे कारण आहे. आपले खेळाडू संपूर्ण जगात अव्वल आहेत. त्यांनी चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. याशिवाय कपिल देव यांच्या प्रकरणाबाबत ते म्हणाले की, अशा प्रसंगी माजी दिग्गज खेळाडूंना नक्कीच आमंत्रित केले गेले पाहिजे होते. त्यामुळे मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंचे मनोबल उंचावले असते, मात्र अशा महत्त्वाच्या प्रसंगी दिग्गज खेळाडूंना निमंत्रित न करणे दुर्दैवी आहे.
पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांची उपस्थिती…
दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे राज्यपालही उपस्थित होते. तसेच अनेक मोठे सेलिब्रिटी आले होते, ज्यात शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय…
दरम्यान, या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य होती. इंडियानं सर्व 10 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. येथे टीम इंडियाचा विजयाचा दावा मजबूत होता पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषक फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 240 धावा केल्या, जे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 7 षटक शिल्लक असताना पूर्ण केले.
कांगारू संघाने येथे 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. यानंतर आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.






