IND vs AUS Final, PM Narendra Modi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधानांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे राज्यपालही दिसले. अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक मोठे सेलिब्रिटी आले होते, ज्यात शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सचा समावेश आहे.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi arrived at Narendra Modi Stadium in Ahmedabad to watch India vs Australia World Cup final match. pic.twitter.com/c0CJ97ULso
— ANI (@ANI) November 19, 2023
भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर ढेपाळलेली दिसली . सलग सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून सामन्यातील आपले वर्चस्व कायम राखले. विरोधी कांगारू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेली टीम इंडिया फलंदाजीत खराब फॉर्ममध्ये दिसत होती.
टीम इंडिया 240 धावांवर गारद…
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 240 धावांच्या आधीच रोखलं. भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 240 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून केएल राहुल यानं 107 चेंडूत एका चौकारासह 66 धावांची खेळी केली. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. रोहित 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा करून बाद झाला. सूर्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या. भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.