Hinjawadi IT Park: आयटी पार्कच्या पुनरुज्जीवनासाठी १,७५६ कोटींचा मास्टरप्लॅन! सहा जोडरस्ते, मेट्रोसाठी ‘लास्ट माइल’ नेटवर्क
Hinjawadi IT Park:वाहतूक कोंडी, खड्डे अन् कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष कृती आराखडा

पिंपरी – वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे झालेली रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि कचऱ्याची समस्या अशा विविध अडचणींनी ग्रासलेल्या हिंजवडी आयटी पार्कच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल १ हजार ७५६ कोटी रुपयांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून हा आराखडा राबविण्यात येणार असून, रस्ते विकासासह भूसंपादन, मेट्रो जोडणी, वाहतूक व्यवस्थापन आणि कचरामुक्तीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे लाखो आयटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हिंजवडी परिसरातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी १७.७४ किलोमीटर लांबीच्या सहा प्रमुख जोडरस्त्यांचा विकास केला जाणार आहे. यासाठीच्या १,७५६.७९ कोटी रुपयांच्या निधीपैकी १,२६४.५३ कोटी रुपये भूसंपादनासाठी, तर ४४२.२६ कोटी रुपये बांधकामासाठी खर्च केले जाणार आहेत. सूर्या हॉस्पिटल ते साखरे वस्ती, ठाकर वस्ती, नांदे ते माण आणि शनी मंदिर ते मारुंजी या प्रमुख मार्गांचा यात समावेश आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढील १५ ते २० दिवसांत खड्डे बुजविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या भागातील अपघात आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते सुधारणेला प्राधान्य देण्यात आले आहे.
मेट्रो स्थानकांपासून कंपन्यांपर्यंत स्वतंत्र जोडणी
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो मार्ग-३च्या कामालाही गती देण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकांपासून आयटी कंपन्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना सहज पोहोचता यावे, यासाठी २२६.५४ कोटी रुपये खर्चून १९.१ किलोमीटरचे स्वतंत्र अंतिम टप्पा वाहतूक जाळे उभारले जाणार आहे.
गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी
वाकड पूल, भूमकर चौक, लक्ष्मी चौक आणि विप्रो सर्कल या गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ८ या गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी घालण्याचे नियोजन आहे. तसेच विविध कंपन्यांच्या कार्यालयीन वेळांमध्ये अंतर ठेवून एकाच वेळी होणारी मोठी वाहनांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कचरा आणि पावसाळी पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार
हिंजवडीतील कचरा व्यवस्थापनासाठी मोशी कचरा डेपो प्रकल्पाशी जोडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी २५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांवरील अतिक्रमणे हटविणे आणि ६० किलोमीटर पावसाळी गटारांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दर शुक्रवारी आढावा बैठक
या सर्व कामांच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी चाकण मॉडेलच्या धर्तीवर दर शुक्रवारी उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या केवळ कागदावरील आराखड्यापुरत्या न राहता प्रत्यक्षात मार्गी लागणार का, याकडे आयटी क्षेत्राचे तसेच लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.





