जामखेड – शहर व तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. या पावसामुळे पिके किमान तीन आठवडे तग धरू शकतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी
सांगितले.
जामखेड शहर व तालुक्यात गेल्या मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. दिवसा अधूनमधून पडणारा पाऊस रात्री चांगलाच बरसला. रात्रभर संततधार सुरू होती. तालुक्यात झालेल्या पावसाने सोयाबीनला जीवदान मिळाले. तालुक्यात सरासरी खरिपाच्या 85 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे उडीद पेरण्यास उशीर झाला. पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी उडदाऐवजी सोयाबीन पेरणी केली. यंदा सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सारोळा येथील शेतकरी अशोक काशीद यांच्या शेतास भेट देऊन उडीद पिकाची पाहणी केली. सद्यःस्थितीत या पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांच्या उडीद पिकावरही ही कीड येऊ शकते किंवा आलेली असू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांन शेताची पाहणी करून घ्यावी. उडदाच्या प्राथमिक अवस्थेत काळजी न घेतल्यास भविष्यामध्ये मोठे नुकसान संभवते.
त्यामुळे शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन कृषी अधिकारी सुपेकर यांनी केले. शेतकरी उडीद पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करतात. यासह गेल्या काही वर्षांपासून तुरीचे क्षेत्रही वाढत आहे. मध्यंतरीच्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, उगवण झाल्यानंतर पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता मंगळवारी पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. तालुक्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये : जामखेड 51,
अरणगाव 54.5, खर्डा 41.8, नान्नज 60, नायगाव 58.