‘ही-मॅन’ची राजकीय सफर ! निवडणुकीत न उतरण्याची शपथ घेणारे धर्मेंद्र कसे झाले खासदार? वाचा रंजक किस्सा

Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि ‘गरम धरम’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी २००४ मध्ये अचानक राजकारणात उडी घेतली. भाजपच्या तिकिटावर राजस्थानातील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या रामेश्वर लाल दुडी यांचा सुमारे ६०,००० मतांनी पराभव करत खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांची राजकीय कारकीर्द निराशेत बदलली. त्यांनी पुन्हा कधीही निवडणूक न लढवण्याची शपथ घेतली.
प्रचारात ‘शोले’ स्टाइल, विजयानंतर गायब
प्रचारादरम्यान धर्मेंद्रांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपट ‘शोले’मधील डायलॉगचा वापर करत जनतेला हसवले आणि प्रभावित केले. “सरकारने ऐकले नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारून घेईन,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण खासदार झाल्यानंतर मात्र पूर्णपणे उलटे झाले. मतदारसंघात त्यांचा वावर जवळपास शून्य राहिला. संसदेतही त्यांची हजेरी अत्यंत कमी होती. बिकानेरच्या जनतेने वारंवार तक्रार केली की, “आमचे खासदार फार्महाऊस किंवा शूटिंगला जास्त वेळ देतात, आमच्याकडे येतच नाहीत.”
२००९ नंतर कायमची राजकारणाला राम-राम
२००९ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर धर्मेंद्रांनी पुन्हा निवडणूक लढवली नाही. त्यांनी जणू काही मौनव्रतच घेतले आणि राजकारणापासून कायमची फारकत घेतली. त्यांचा मुलगा सनी देओल याने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, “पापांना राजकारणाची गोष्ट आवडतच नाही. त्यांना निवडणूक लढवल्याचा पश्चात्ताप झाला. ही जागा त्यांच्यासाठी नव्हती”, सनीने म्हंटल होत.
नोकरी सोडली आणि सिनेइंडस्ट्रीत आयुष्य बदललं
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा येथील आर्य हायस्कूलमध्ये झालं. धर्मेंद्रंचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं, त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी नोकरी सोडली आणि फिल्मफेअरच्या स्पर्धेत सहभाग घेतला. धर्मेंद्र १९ वर्षांचे असताना प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला. नंतर चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांची ओळख हेमा मालिनी यांच्याशी झाली आणि दोघांनी विवाह केला.
धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. याशिवाय त्यांच्या ‘फूल और पत्थर’, ‘यादों की बारात’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘नौकर बिवी का’, ‘बेताब’, ‘घायल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. २५ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. २०१२ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





