Gram Panchayat: जुन्नरमधील ६८ ग्रामपंचायतींच्या विकासकामांना ब्रेक; अधिकार नसल्याने प्रशासक सरपंच हतबल
Gram Panchayat: प्रशासक सरपंचांना केवळ दैनंदिन कामांची मुभा; अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेले, गटारे तुंबली, तरी दुरुस्तीचा निधी खर्च करण्यास शासनाची बंदी.

Gram Panchayat – जुन्नर तालुक्यात फेब्रुवारी २०२६ मध्ये कार्यकाळ संपलेल्या ६८ ग्रामपंचायतींचा कारभार सध्या प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या विद्यमान सरपंचांकडे आहे. मात्र आर्थिक आणि धोरणात्मक अधिकारांवरील निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प झाली असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंचांकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार शासनाने मार्च महिन्यात आदेश काढले.
मात्र प्रशासक सरपंचांना केवळ दैनंदिन स्वरूपाची कामे करण्यापुरतेच अधिकार देण्यात आल्याने नवीन विकासकामांना मंजुरी, निधी खर्च, ठेकेदारांची देयके अदा करणे किंवा महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेणे शक्य होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात या मर्यादांचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील रस्त्यांचे नुकसान झाले असून गटारे तुंबणे, शाळांच्या परिसरात खड्डे पडणे,
काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरणे अशा घटना घडल्या आहेत. मात्र दुरुस्तीची बिले मंजूर करण्याचे अधिकार नसल्याने आवश्यक कामे रखडली आहेत.
प्रशासक सरपंचांकडे वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या नियमित कामांची जबाबदारी असली तरी धूर फवारणी, आपत्कालीन दुरुस्ती, नवीन विकासकामे किंवा निधी खर्च करण्यास त्यांना परवानगी नसल्याने ग्रामपंचायती अडचणीत सापडल्या आहेत.
जबाबदारी दिली, पण अधिकार नाही
पेमदराचे प्रशासक सरपंच जयश्री गाडेकर यांच्यावर, “जबाबदारी दिली आहे; मात्र आवश्यक अधिकार नसल्याने अनेक तातडीची कामेही करता येत नाहीत. शासनाने प्रशासक सरपंचांना आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार त्वरित द्यावेत,” अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, विकासकामे पूर्ण करूनही अनेक ठेकेदारांची देयके महिनोनमहिने प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती आणि ठेकेदारांमध्ये वाद वाढत असून रस्ते, गटारे, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित कामांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
सरपंच आणि अधिकारी प्रशासक यांत दुजाभाव
विशेष ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या ठिकाणी विकासकामे आणि आर्थिक व्यवहार तुलनेने सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरपंच प्रशासक आणि अधिकारी प्रशासक यांच्यात दुजाभाव होत असल्याची भावना अनेक लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत. काही ग्रामपंचायत हद्दीत अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते वाहून गेले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत.





