Pune District : जांबुत ग्रामपंचायत नागरिकांच्या जीवाशी खेळतेय काय? बाजारातळ परिसरात घाणीचे साम्राज्य
Pune District : मात्र अद्यापही जांबुत ग्रामपंचायतकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने परिरसरातील नागरिकांनी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जांबुत : शिरूर तालुक्यातील महत्वपूर्ण बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या जांबुत (ता. शिरूर) येथील जुना बाजारतळ परिसरात असलेल्या हातपंप परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचून ते रस्त्यावर आल्याने सुटलेल्या दुर्गंधीमुळे गावठाण आणि बाजारतळ परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतकडून ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने आरोग्याविषयक विविध आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात असुन ग्रामपंचायत प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळतेय काय असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र अद्यापही जांबुत ग्रामपंचायतकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने परिरसरातील नागरिकांनी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे बाजारातळ परिसरातील हातपंपाचे आवरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल आणि दुर्गंधी पसरली असल्याने परिसरातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असुन याबाबत ग्रामपंचायत प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येते.
तसेच या भागातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटाराचे चेंबरदेखील साफ न करण्यात आल्याने संपूर्ण पाणी तुंबल्याने निर्माण झालेल्या घाणीमुळे टायफाईड, मलेरिया, डेंगू, चिकूनगुनिया आदी आजार जडण्याची भीती यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
या सार्वजनिक परिसरातील असलेल्या हातपंपाचे पाण्याचा पिण्यासाठी नागरिक वापर करत आहे, मात्र साचलेल्या घाणीमुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसून त्याच पाण्यातून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना ये जा करावी लागत असल्याने अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी सांगण्यात आले.
मात्र ग्रामपंचायतकडून अद्यापही कोणती ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामपंचायत कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असुन तातडीने सदर गटारांचे चेंबर साफ करून हातपंप परिसर स्वच्छ करून जलनिस्सारणची उपाययोजनात्मक व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





