Ashadhi Wari: अलंकापुरी सजली! माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत प्रशासकीय तयारी पूर्ण; असे आहे नियोजन
Ashadhi Wari: मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून केली पाहणी; इंद्रायणी नदी घाट, मंदिर परिसर आणि मुक्कामाच्या ठिकाणांची तपासणी.

Ashadhi Wari – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या मोठ्या संख्येने आगमन होत असल्यामुळे शहरात स्वच्छता राखणे, मोबाईल स्वचलय.भोजनालय मधील अन्न स्वच्छता आरोग्य विषयक तयारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व तयारीची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली. पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून दरवर्षी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात. यामुळे शहरावर मोठा ताण येतो. ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने यंदा विशेष नियोजन करून विविध विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
स्वच्छता विभागाकडून शहरातील प्रमुख रस्ते, घाट परिसर, मुक्कामाच्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाहणीदरम्यान इंद्रायणी नदी घाट, मंदिर परिसर, पालखी मार्ग तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणांची तपासणी केली. त्यांनी स्वच्छतेच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले असले तरी काही ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून विविध ठिकाणी टँकर तसेच पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय तात्पुरती शौचालये उभारण्यात आली असून त्यांची नियमित स्वच्छता राखण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका तसेच प्राथमिक उपचार केंद्रे तयार ठेवण्यात आली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापनालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल करून पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मदत केंद्रे आणि सूचना फलक लावण्यात आले आहेत.
तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश
स्वच्छतेच्या दृष्टीने, कचरा व्यवस्थापनासाठी विशेष गाड्या, कर्मचारी आणि यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. प्लॅस्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून वारकऱ्यांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी” हा संदेश देत प्रशासनाने नागरिक आणि वारकऱ्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
या पाहणीदरम्यान विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी आपापल्या विभागातील तयारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना माहिती दिली. काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा, कचऱ्याचे ढीग किंवा वाहतुकीची समस्या दिसून आल्यास तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.





