Government School : शाळा प्रवेशोत्सवाचे उपक्रम फेल? ४ वर्षांत सरकारी शाळांमधील पहिलीची पटसंख्या कमालीची घटली
Government School : शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजना आणि शाळा प्रवेशोत्सवानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिलीची पटसंख्या घटल्याचे उघड.

Government School – शालेय शिक्षण विभागाकडून मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सवाचे उपक्रम राबवून, तसेच मंत्री, अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देण्याचा उत्सव करूनही गेल्या चार वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता पहिलीची पटसंख्या घटल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मागील काही वर्षांत खासगी शाळांची संख्या खूप वाढली आहे. गल्ली बोळात शाळा उभारल्या गेल्या आहेत.
सीबीएसई, सीआयसीईएसई यांच्यासह अन्य बोर्डाची संलग्नता मिळविण्याकडेही शाळांचा कल वाढला आहे. काही नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आकर्षक अशा सुविधाही उपलब्ध आहेत. पालकही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याला प्राधान्य देत आहेत. नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांमध्ये तीव्र स्पर्धाच दिसत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इयत्ता पहिलीला प्रवेश घेण्याकडे पालक पाठ फिरवू लागले आहेत.
चार वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या १ लाख ३७ हजारांनी कमी झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सन २०२३-२४ मध्ये पटसंख्येतील ६९ हजार ३६६ होती. २०२४-२५ मध्ये ४६ हजार ९४६, सन २०२५-२६ मध्ये २१ हजार २९४ याप्रमाणे इयत्ता पहिलीची पटसंख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षीही शाळा प्रवेशोत्सवासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी विविध भागातील शाळांना भेटीही दिल्या. अधिकाऱ्यांनी शाळांना भेटीचे टार्गेट ठरवून देण्यात आले होते. शासनाच्या विविध योजनांची माहितीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. त्याबाबत शाळांमध्ये जागृतीही करण्यात आली होती. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न झाले. मात्र, शिक्षण विभागाला पटसंख्या वाढविण्यात यश काही मिळाल्याचे दिसत नाही.





