IND vs NZ Test Series : फलंदाजांवर लगाम लावण्याची आवश्यकता नाही – गौतम गंभीर

IND vs NZ Test Series – बुधवारपासून भारत व न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वकसोटी मालिकेतील ही मालिका असणार आहे. सध्याच्या घडीला भारत विश्वकसोटी स्पर्धेच्या गुणतक्त्यात अग्रस्थानी असून न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहे. या मालिकेतील लढती बेंगळुरू, पुणे व मुंबई येथे होणार आहेत.
भारत व बांगलादेश यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीमध्ये पावसाने दोन दिवसांचा खेळ वाया घालविला होता. मात्र, त्यानंतर भारताने आक्रमक फलंदाजी करताना बांगलादेशला पराभूत करून कसोटीमालिका 2-0 अशी जिंकली. यावेळी भारताच्या आक्रमक खेळाविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या भूमिकेचे समर्थन केले.
🗣️🗣️ We want to be the team that can score 400 in a day and also the team that can bat for two days to draw a Test.
Head Coach Gautam Gambhir talks about #TeamIndia‘s adaptability and approach. #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @GautamGambhir pic.twitter.com/Ta6MlGmbLh
— BCCI (@BCCI) October 14, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी लढतीपूर्वी गौतम गंभीर म्हणाले की, आम्हाला फलंदाजांवर लगाम लावण्याची आवश्यकता नाही. फलंदाज नैसर्गिक खेळ करून दिवसभरात 400 ते 500 धावा करू शकतात, तर त्यामध्ये गैर काय ? असा सवाल उपस्थित करताना, त्यांनी जेवढी जोखीम जास्त, तेवढा फायदा जास्त. हे आम्ही मान्य करत आल्याचे गंभीर म्हणाले. याचबरोबरीने त्यांनी आक्रमक खेळताना अपयश देखील मिळू शकते, हे सांगताना 100 धावांमध्ये संघ बाद झाला तरी आम्ही ते स्वीकारू असे, म्हटले.
एका दिवसात 400 धावा
कसोटीमध्ये परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. जुळवून घेणारे खेळाडू हे संघासाठी महत्वाचे आहेत. ते म्हणाले की, आम्हाला एका दिवसात 400 धावा करणारा संघ अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये दोन दिवस फलंदाजी करून सामना अनिर्णित राखण्यासाठी मदत करू शकेल. याला परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणतात. हे कसोटी क्रिकेट आहे, तुम्ही जुन्याच गोष्टी घेऊन बसलात, तर तुम्ही पुढे जावू शकणार नाहीत.
सामना जिंकणे हेच आमचे लक्ष्य
कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये असल्याचा विश्वास प्रशिक्षक गंभीर यांनी व्यक्त केला. आमच्या संघात असे फलंदाज आहेत, जे दोन दिवस फलंदाजी करू शकतात. त्यामुळे आमचे पहिले लक्ष्य सामना जिंकण्यावर आहे. बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास आमच्यासाठी सामना अनिर्णित करणे हा दुसरा किंवा तिसरा पर्याय असणार आहे.
सध्या लक्ष्य न्यूझीलंड मालिकेवर…
न्यूझीलंडचा संघ चांगला असून यावेळी आव्हान सादर करेल असे वाटते. त्यामुळे या तीन लढती महत्वाच्या आहेत. प्रतिस्पर्धी न्यूझीलंड असो की ऑस्ट्रेलिया, परंतु आम्हाला चांगले क्रिकेट खेळून प्रत्येक सामना जिंकायचा आहे. आम्ही खूप पुढचा विचार करत नाही, त्यामुळॆ आमचे लक्ष्य फक्त न्यूझीलंड मालिकेवर असल्याचे प्रशिक्षक गंभीर म्हणाले.
विराट अजूनही धावांसाठी भूकेला
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर झालेल्या 8 लढतीमध्ये कोहलीला विशेष काही करता आले नव्हते. या संदर्भात बोलताना गंभीर म्हणाले की, तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. एवढ्या मोठ्या कारकिर्दीनंतर ही तो धावांसाठी भूकेला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळीनंतर त्याच्या खेळीचे विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. त्याला अपेक्षित सुर मिळाला की, तो पुन्हा मोठी खेळी उभारू शकेल. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपूर्वी विराटला अपेक्षित सूर गवसला असेल, असा विश्वास गंभीर यांनी व्यक्त केला.





