Ganga water in Haridwar : हरिद्वारची गंगा प्रदुषित ! पिण्याचे पाणी सुद्धा झाले दूषित; अहवालात धक्कादायक माहिती समोर

Ganga water in Haridwar – लाखो प्रयत्न करूनही हरिद्वारमधील गंगाजल कचरा आणि घाणीमुळे पिण्यायोग्य नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणी अहवालानुसार, नुकतेच हरकी पौरीसह चार ठिकाणांहून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमधील पाण्याच्या गुणवत्तेचे मानक ब श्रेणीचे असल्याचे आढळून आले आहे. या पाण्यात एकूण कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. क्लास बी पाणी गाळण्याशिवाय पिण्यायोग्य नाही. मात्र अंघोळीसाठी हे पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे.
14 नोव्हेंबरच्या रात्री भीमगोडा बॅरेजमधून गंगेत पाणी सोडण्यात आले. यापूर्वी गंगा बंददरम्यान घाटांची स्वच्छता करण्यात आली होती. पाणी सोडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरकी पौडी, बिशनपूर कुंडी, बालकुमारी मंदिर जगजीतपूर आणि रुरकी येथील गंगानहार येथील पाण्याचे नमुने घेतले होते. त्यानुसार गंगेच्या पाण्यात कोलिफॉर्म बॅक्टेरियाची पातळी प्रमाणित मानकांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. हरकी पौडीमधून घेतलेल्या नमुन्यात बॅक्टेरियाची पातळी 70 एमपीएन नोंदवली गेली. तर रुरकी गंगानगरमध्ये त्याचे प्रमाण १२० एमपीएन आहे.
मात्र, पाण्यातील जैविक ऑक्सिजनच्या मागणीचे प्रमाण ठीक असल्याचे आढळून आले आहे. हरकी पौडी येथे त्याचे प्रमाण 1 मिलीग्राम प्रति लिटर, बालकुमारी मंदिराजवळ 1.2, बिशनपूर येथे 1.2 आणि रुरकी गंगानगर येथे 1 मिलीग्राम प्रति लिटर असल्याचे आढळून आले.
करोडो खर्च झाले तरीही गंगा प्रदूषित
गंगेच्या पाण्याची शुद्धता राखण्यासाठी नमामि गंगे प्रकल्पात कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनेही गंगेत घाण टाकणे बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही जुने कपडे, प्लास्टिक, पुजेची फुले व इतर साहित्य, कचरा, घाण गंगेत टाकली जाते. जानेवारीपासून हरिद्वारमध्येही महाकुंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बातमीने चिंता वाढली आहे.





