चिंबळी – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, खेड तालुक्यातील औद्योगिक पट्ट्यातील कुरुळी येथील मूर्तिकारांवर यंदा महागाईची झळ बसली आहे. मूर्ती बनवण्यासाठी लागणार्या कच्च्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने, यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे कारागिरांनी सांगितले.कुरुळीतील कुंभार वाड्यात गेल्या 40 वर्षांपासून मूर्ती घडवण्याची परंपरा सुरु आहे. यंदा सुमारे 15 ते 20 हजार गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून, सध्या रंगकाम आणि अंतिम सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक भागातून या मूर्तींसाठी आगाऊ मागणी केली जाते. यंदा शाडू माती, नैसर्गिक रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च आदी सगळ्याच बाबींमध्ये लक्षणीय दरवाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तिकारांचे गणित कोलमडले असून, किमती वाढवणे अपरिहार्य ठरले आहे. आम्ही शक्य तेवढ्या कमी नफ्यात काम करत आहोत.कुरुळी परिसरातील कुंभार समाजाच्या या परंपरेमुळे गणेशभक्तांना दर्जेदार मूर्ती मिळतातच, पण स्थानिक बेरोजगार युवकांनाही या काळात रोजगाराचा आधार मिळतो. कुरुळी येथील मूर्तिकार हे फक्त कलेचे नव्हे, तर श्रद्धेचेही संवाहक आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तींसाठी अनेक ग्राहकांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. काही मूर्ती तर पूर्णतः पर्यावरणपूरक आहेत-शाडू मातीपासून बनवलेल्या, ज्या घरच्या घरी विसर्जित करता येतात. स्थानिक महिला, युवक, तसेच शालेय सुट्टीतील विद्यार्थीही मूर्ती रंगविण्याच्या कामात हातभार लावत आहेत. यामुळे कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो, शिवाय एक सामाजिक सलोखा आणि सहकार्याची भावना निर्माण होते. गणेशभक्तांनी स्थानिक कलाकारांकडून मूर्ती खरेदी करून त्यांचे प्रोत्साहन करावे, असा संदेश येथील मूर्तिकारांनी दिला आहे. गणपती बाप्पा येताना आमच्यासाठी आनंदही आणतो आणि जगायला उमेदही, असं भावना मूर्तिकारांनी व्यक्त केली. आमचे काम नाही, आराधना आहे ग्राहक नाराज होऊ नयेत, पण वाढलेल्या खर्चामुळे आम्हालाही मर्यादा आहेत, अशी भावना येथील मूर्तिकारांनी व्यक्त केली. कलेबरोबर श्रद्धेचा समतोल राखत आम्ही मूर्ती घडवतो. हे आमचं काम नाही, आमचं आराधन आहे, असे मूर्तिकाराने सांगितले.