माधव विद्वांस
गदर पार्टीचे संस्थापक, क्रांतिकारक, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1889 रोजी तळेगाव ढमढेरे येथे झाला. 1910 मध्ये ते शिक्षण घेत असलेले समर्थ विद्यालय ब्रिटिशांनी बंद केले. त्यानंतर पिंगळे मुंबईला गेले. त्यांना माहीम येथे गोविंदराव पोतदार यांच्या “पायोनियर अल्कली’ या कारखान्यात नोकरी मिळाली. पोतदार हे राष्ट्रवादी होते आणि स्फोटकांचे तज्ज्ञ होते. जपानी हातमाग उद्योगातून प्रेरित होऊन स्वदेशी चळवळीच्या उद्देशाने, पिंगळे यांनी लातूरजवळील औसा येथे स्वतःचा एक हातमाग सुरू केला. 1911 मध्ये त्यांनी औसा सोडले कारण त्यांना अमेरिकेला जाऊन इंजिनिअर व्हायचे होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना अमेरिकेला जाण्याचा निर्णय सांगितला नव्हता, फक्त रेल्वे स्टेशनवर आपल्या भावास कल्पना दिली व ते हॉंगकॉंगमार्गे अमेरिकेला गेले आणि 1912 मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून दाखल झाले.
पारतंत्र्याची टोचणी त्यांना सतत जाणवत होती. पारतंत्र्यात मानहानीने राहण्याचा त्यांना उबग आला होता. त्यामुळे क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. अमेरिकेतील ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानात राहून त्यांनी लष्करी सिद्धतेला सुरुवात केली होती. त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्या नेतृत्वाखाली गदरपार्टी नावाने एक संघटना स्थापना केली. या संघटनेत प्रामुख्याने शीख व पंजाबी होते. अमेरिकेतील भारतीयांनी ही चळवळ 1913 मध्ये उभारली. खानखोजे व पं. काशीराम ह्यांनी हरदयाळांच्या पूर्वी पाच वर्षे अमेरिकेत गदरचे कार्य सुरू केले होते. लाला हरदयाळ व भाई परमानंद यांनी 1914 मध्ये गदर पक्ष स्थापला. युरोपमध्ये पहिले महायुद्ध सुरू होताच जर्मन, युरोपमधील बर्लिन समिती आणि अमेरिकेतील गदर चळवळ यांच्यात भारतात विद्रोह करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने पिंगळे भारतात आले.
रासबिहारी बोस, सच्छिंद्रनाथ संन्याल, कर्तारसिंह सराबा, सरदार बक्षीससिंह, सरदार जगनसिंह, सरदार सुरायणसिंह, सरदार बुटासिंह, सरदार ईश्वरसिंह, सरदार हरनामसिंह आदींनी 21 फेब्रुवारी 1915 रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठाव करण्याची योजना केली होती. वाराणसीमध्ये असलेल्या बंगालीटोला या बंगाली वसाहतीमध्ये राहायला गेले.
तेथे पिंगळे यांनी जतीन मुखर्जी यांचे पत्र घेऊन त्यांची भेट घेतली आणि गदरचे सुमारे 4 हजार शीख कलकत्ता येथे पोहोचल्याचे सांगितले. तसेच आणखी 15 हजार बंडखोरीत सामील होण्यासाठी येण्याची वाट पाहात असल्याची माहिती दिली. पिंगळे यावेळी क्रांतिकारक गोळा करण्यासाठी बरेच दिवस पंजाबमध्ये राहिले होते, पंजाबमध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कलकत्त्याहून अनेक बॉम्बतज्ज्ञ दाखल झाले. व्यापक उठावाची ब्रिटिश सरकारला कुणकुण लागली, फितुरीमुळे त्यांचा कट फसला आणि त्यातील विष्णू पिंगळेसहित 8 क्रांतिकारक सरकारच्या तावडीत सापडले. अटक झालेल्या आठही क्रांतिकारकांना 16 नोव्हेंबर 1915 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.