पुणेः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षातील मंत्री, आमदार यांच्या वतीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी देखील त्यांना प्रयत्नशील रहावे, असे अजित पवारांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या या आदेशाला मंत्री धनंजय मुंडे यांनी केराची टोपली दाखवली आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही जनता दरबार उपस्थित राहिलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या पक्ष कार्यालयातील जनता दरबारला 7 जानेवारीपासून सुरूवात झाली होती. आत्तापर्यंत जनता दरबाराचे 6 आठवडे उलटून गेले पण आतापर्यंतच्या एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडे उपस्थित राहिलेले नाहीत. यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे. जनता दरबारासाठी मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मंत्र्यांना दिवसाचे वार ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार दर मंगळवारी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांचा जनता दरबार भरणार होता. पण मंत्री धनंजय मुंडे हे एकाही जनता दरबाराला उपस्थित राहिलेले नाहीत. तर बुधवारी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, आदिती तटकरे जनता दरबाराचे आयोजन केले जाणार आहे. बारामतीमध्ये दादांचा जनता दरबार अजित पवार यांनी यापूर्वी बारामतीमध्ये जनता दरबार घेतला आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून पक्षाचे नेते जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचवेळी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम पक्षाचे हे सर्व मंत्री करतील, असे ठरवण्यात आले आणि तशा सूचना देखील अजित पवार यांनी पक्षातील आमदार, मंत्र्यांना केल्या आहेत.