Sanjay Raut : मोदींची जागा शाह घेणार? राऊतांचा सर्वात मोठा दावा; म्हणाले “त्यासाठी हे सगळं…”
Sanjay Raut : या तिरंगा मार्चअगोदर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Sanjay Raut : आज मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या वतीने तिरंगा मार्चचे आयोजन करण्यात आले असून, येथे मोठ्या संख्येने तरुण जमा झाले आहेत. खरंतर तिरंगा मार्च काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, काल एक मोठी घडामोडी घडली.
जी मागणी आंदोलनकर्त्यांकडून लावून धरण्यात आली होती, अखेर ती मागणी मान्य झाली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यांनी तिरंगा मार्च जल्लोष करण्यासाठी निघणार असल्याचे जाहीर केले. या जल्लोष मार्च आधी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
“अमित शाह यांना तातडीने देशाचे उपपंतप्रधान बनायचे आहे, त्यानंतर त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, त्यासाठी हे सगळं चालू आहे. अमित शाह यांना मोदींना बदनाम करायचं आहे, ही आतल्या गोटातील माहिती आहे.” असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. तसेच तिरंगा मार्चविषयी बोलताना त्यांनी महत्वाची माहिती दिली.
“शिवाजी पार्कवर तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचे आयोजन केलेले आहे. कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकणार नाही. तिथे सर्वांनी यावे, तिथे व्यासपीठ नाही; तिथे फक्त दोन भाषण होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण होईल.” असे संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
अमित शाहांवर टीकेचे बाण
“दिल्लीत जंतर-मंतरवर पोलिसांनी मुलांवर हल्ला केला, मुलींचे कपडे फाडले, आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. देशात आज जे जे काही चुकीचं आणि लोकशाहीविरोधी घडत आहे, त्या सगळ्यासाठी अमित शाह जबाबदार आहेत. अमित शाह यांना तातडीने देशाचे उपपंतप्रधान बनायचे आहे, त्यानंतर त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, त्यासाठी हे सगळं चालू आहे. अमित शाह यांना मोदींना बदनाम करायचं आहे, ही आतल्या गोटातील माहिती आहे. अमित शाहांना मोदींना बदनाम करुन त्यांना पदावरुन हटवायचं आहे. पण अमित शाह कधी देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यांना देशाचा आणि तरुणांचा तळतळाट लागला आहे. तुम्ही माझे हे म्हणणे लक्षात ठेवा.” अशा शब्दांत संजय राऊतांनी अमित शाहांना लक्ष्य केलं.






