“स्वित्झर्लंडच्या विमानातून…”; बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत नितेश राणेंचाही मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

Nitesh Rane : शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते, हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला होता. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अशातच आता त्यांनी केलेल्या आरोपावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम यांचा बाण बरोबर सुटला, रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर आहे असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांनी देखील या दाव्यावर आणखी एक मोठा दावा केला आहे.स्वित्झर्लंडच्या विमानातून कोण येणार होते, कोण वाट पाहत होते, कोणत्या कागदपत्रासाठी वाट पाहिली गेली, कोणत्या संपत्तीसाठी? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले. यामुळे राजकारणात चांगलचं ढवळून निघालं आहे.
मराठावाड्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिला मोर्चा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर काढावा, असा खोचक टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले होते?
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक माहिती दिली. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा, असं ते म्हणाले.
मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत असल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. आज मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले, असं रामदास कदम यांनी मेळाव्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं.





