Delhi Election 2025 : “भाजपा सत्तेत आल्यास प्रदूषणातून मुक्ती”; नितीन गडकरी यांचे दिल्लीकरांना वचन

नवी दिल्ली – जर भारतीय जनता पक्षाने ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर पाच वर्षांत राष्ट्रीय राजधानी वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणमुक्त होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले.
डबल इंजिन सरकारच्या फायद्यांवर भर देताना गडकरी म्हणाले, जर केंद्रात मोदी सरकार असेल आणि दिल्लीत भाजपचे सरकार असेल तर राजधानीची प्रगती बुलेट ट्रेनपेक्षा १० पट वेगवान होईल.
नांगलोई येथे जाट येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी दिल्लीला वायू प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या समस्यांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले.
गडकरी पुढे म्हणाले की, मी सर्वांना वचन देतो. जर तुम्ही दिल्ली सरकारमध्ये भाजपचे इंजिन बसवले तर आम्ही पाच वर्षांत दिल्लीला वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणापासून मुक्त करू. आम आदमी पक्ष (आप) सरकार राष्ट्रीय राजधानीतील पाणी आणि प्रदूषण संकट सोडवण्यात अपयशी ठरले आहे.
ज्या लोकांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्यांना ना पिण्याच्या पाण्याची पर्वा होती ना यमुनेच्या शुद्धीकरणाची. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.





