Rishabh Pant – भारतीय संघात खेळताना ऋषभ पंत टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरत आहे. त्याला वारंवार संधी मिळाल्या असूनही तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याला दोन सामन्यात फलंदाजीसाठी सलामीला संधी मिळाली, मात्र तो धावा करण्यात चुकला. पंतच्या याच खराब कामगिरीमुळे त्याच्यावर आता टीका होऊ लागली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंग सोधीने पंतबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतला वगळून सॅमसनला संघात संधी द्यावी, असे मत त्याने व्यक्त केले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये वारंवार संधी मिळूनही ऋषभ पंत ( Rishabh Pant ) फ्लॉप ठरत असून न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याची खराब कामगिरी दिसून आली. तिसऱ्या सामन्यात पंत सलामीला येऊन अवघ्या ११ धावा करून बाद झाला. याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही तो केवळ ६ धावा करून बाद झाला होता. पंत सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करेल असे बोलले जात होते पण गेल्या दोन सामन्यांत त्याची बॅट शांत राहिली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर बरीच टीका सुरु झाली आहे.
माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंग सोधीने म्हटले की, “ऋषभ पंत ( Rishabh Pant ) आता संघावर ओझे ठरत आहे. त्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनला आणण्याची गरज आहे. तुम्हाला सॅमसनला संधी द्यावी लागेल, कारण प्रत्येक वेळी तुम्ही टी-२० विश्वचषक किंवा आयसीसी ( ICC ) स्पर्धांमध्ये पराभूत होऊन अशा प्रकारे बाहेर पडू शकत नाही. जेव्हा तुम्ही खूप जास्त संधी देतात तेव्हा समस्या येतात. त्यामुळे आता नव्या खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. पंतसाठी दिल्या जाणाऱ्या संधी संपत आहेत त्यामुळे त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. तुम्ही इतके दिवस फक्त एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. जर ते कामगिरी करत नसेल तर त्यांना बाहेर काढावे लागेल.