Satara | जिल्ह्यात आणखी पाच जनावरांचा मृत्यू

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी स्किनने डोके वर काढले असून जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लंपी स्किनने सोमवार अखेर ८१८ जनावरे बाधित आढळून आली असून ६२५ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.
सध्य स्थितीत १४९ जनावरांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी पाच जनावरांचा मृत्यू झाला असून यामध्ये सातारा तालुक्यातील चार जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवार अखेर २१ जनावरांचा लंपीने मृत्यू झाला आहे.
लंपी स्किनचा प्रादुर्भाव यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून . जिल्ह्यात उपचारानंतर ६२५ जनावरे बरी झाली आहेत.
१४९ जनावरांवर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरु आहेत. खंडाळा तालुक्यात ८, कोरेगाव तालुक्यात ५, खंडाळा तालुक्यात ८ अशा २१ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्यस्थितीत सातारा तालुक्यात १५ , कोरेगाव तालुक्यात २८, खटाव तालुक्यात १ , फलटण तालुक्यात ३८ , खंडाळा तालुक्यात ८ , वाइ तालुक्यात २९ , जावळी तालुक्यात १८ ,
महाबळेश्वर तालुक्यात ११, कराड तालुक्यात१ अशा १४९ जनावरांवर उपचार सुरु आहेत. फलटण, सातारा, वाइ, खंडाळा, जावळी तालुक्यात प्रादुर्भाव जास्त दिसून येत असून सध्या परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
लागण झालेल्या जनावरांच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना केल्या आहेत.
लंपी सदृश्य लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.



