नेवासे : नेवासे शहरातील नगरपंचायत चौकात बुधवार (दि.१९) रोजी सायंकाळी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास एका व्यावसायिक दुकानाला आग लावून एका मागोमाग एक असे दहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून सर्वच्या सर्व दुकाने आगीत जळून बेचिराख झाल्याची संतापजनक दुर्देवी घटना पुन्हा एकदा शहरात घडली. या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे प्रचंड नुकसान या लागलेल्या आगीमध्ये झालेले आहे. मागच्या वर्षी २७ जुलै २०२४ रोजी याच ठिकाणी बारा व्यावसायिक दुकानांना आग लागून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले होते. त्याच घटनेची पुन्हा दुसरी पुर्नरावृत्ती होवून याच ठिकाणचे व्यावसायिक दुकाने आगीत जळून खाक झाल्यामुळे व्यापारीवर्गासह शहरातून मोठा संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. नेवासे नगरपंचायतीकडे असलेला नवाकोरा अग्निशमन बंब शहरात हाकेच्या अंतरावर असूनही ही आग विझविण्यासाठी हा अग्निशमक बंब वेळेत घटनास्थळी पोहचू शकला नाही. या बंबावर असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे नगरपंचायतीचा बंब हा ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ या सदरात मोडणार ठरलेला आहे. भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखाना आणि सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंब ही आग विझविण्यासाठी शहरात दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. पर्यायाने होणारे नुकसान आणि जिवीतहानी टळली गेली आहे. नेवासे नगरपंचायत चौकासमोर असलेल्या एका व्यावसायिक दुकानाला लागलेल्या आगीत शेजारच्या दुकानाने पेट घेवून या आगीने मोठे रौद्ररुपधारण केले. त्यामुळे शहरात मोठा अग्नितांडव निर्माण झाला होता. या घटनेची माहीती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील, डॉ.करणसिंह घुले, डॉ.निलेश लोखंडे, निरंजन डहाळे, संदिप आलवणे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. सुदैवाने जीवीत हानी नाही बुधवारी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास नगरपंचायत चौकात व्यापाऱ्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एक दुकाणाला आगलेल्या आगीमुळे शेजारीच असलेले दुकाणही या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडवून दहा दुकाणे आगीत बेचिराख झाली आहेत. सुदैवाने जीवीत हानी टळलेली असून आगीचे निश्चित कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वत्र हळहळ घोडेगाव (ता. नेवासे) येथील सचिन चोरडिया यांच्या घोडश्वरी माता फर्निचर या दुकानाला आग लागून फर्निचरचे दुकान पुर्णपणे जळून खाक झाले. बुधवारी शहरात आगीच्या दोन घटना घडल्यामुळे सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.