Nirmala Sitharaman: “देश विकणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असे कधीही करणार नाहीत. उलट २०१३ मध्ये बाली येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) करारावर स्वाक्षरी करून काँग्रेसनेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते,” असा खळबळजनक आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी लोकसभेत केला. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. ‘माई का लाल’ अजून जन्मायचा आहे – राहुल गांधी यांनी सरकारवर लावलेल्या ‘देश विकल्याच्या’ आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना सीतारमण म्हणाल्या, “अजून असा कोणताही व्यक्ती जन्माला आलेला नाही जो भारताला विकू शकेल. किरेन रिजिजू यांनी म्हटल्याप्रमाणे तो ‘माई का लाल’ अजून जन्मायचा आहे.” राहुल गांधींच्या डेटा लोकलायझेशनच्या चिंतेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकार डेटा सेंटर्ससाठी विशेष तरतूद करत आहे जेणेकरून भारतीयांचा डेटा देशातच सुरक्षित राहील आणि त्यातून तरुणांना रोजगार मिळेल. WTO कराराचा तो ‘काळा’ इतिहास – र्थमंत्र्यांनी २०१३ च्या बाली (इंडोनेशिया) येथील WTO कराराचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “२०१३ मध्ये काँग्रेस सरकारने ‘ट्रेड फॅसिलिटेशन’ करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार जानेवारी २०१७ पासून भारत आपल्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करू शकला नसता आणि गरिबांना रेशनही देऊ शकला नसता. पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यावर हा अडथळा दूर केला, अन्यथा देशातील शेतकरी रस्त्यावर आला असता. देश आणि शेतकरी हित विकणारे आम्ही नाही, तर काँग्रेसच आहे.” बंगाल आणि केरळवर टीकास्त्र – महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली. “बंगालमध्ये कायदा नाही तर बॉम्ब चालतात,” असे त्या म्हणाल्या. एका महिला मुख्यमंत्र्यांनी महिलांना रात्री बाहेर न पडण्याचा सल्ला देणे हे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, कम्युनिस्ट शासित केरळचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, तिथे गुंतवणूकदारांना पळवून लावले जात आहे. एनसीआरबी (NCRB) च्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक (प्रति लाख ६६१ गुन्हे) असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. शर्म अल शेखचा दाखला – २००९ मधील शर्म अल शेख कराराची आठवण करून देत सीतारमण यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही निशाणा साधला. “पाकिस्तानचा दहशतवाद बाजूला सारून त्यावेळी समझोता करण्यात आला होता. आज तेच लोक आम्हाला वाटाघाटींचे ज्ञान शिकवत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. हेही वाचा: सुनेत्रा पवारांची मोदी-शहांशी भेट ते भारत-अमेरिका व्यापार करारात मोठे बदल… वाचा आजच्या टाॅप बातम्या