Devendra Fadnavis : फडणवीस यांना पंतप्रधान बनायचयं का? गुंतवणुकीच्या दाव्यांवरून काँग्रेसचा थेट सवाल
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे गुंतवणुकीचा प्रचंड ओघ आल्याचे चित्र आहे.

Devendra Fadnavis – दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे गुंतवणुकीचा प्रचंड ओघ आल्याचे चित्र आहे. मात्र, त्या गुंतवणुकीच्या दाव्यांवर कॉंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान बनायचे आहे का, असा उपरोधिक सवालही केला.
दावोसमधील परिषदेत स्वत: फडणवीस सहभागी झाले. त्या परिषदेत महाराष्ट्र सरकारने तब्बल ३० लाख कोटी रूपयांचे गुंतवणूक करार केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यातून त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे असताना आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३.६ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनल्यावर पुढील वर्षात १५ लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीविषयी बोलले गेले. आता तो आकडा ३० लाख कोटी रूपयांवर गेला आहे.
पंतप्रधान बनण्यासाठी गुंतवणुकीच्या संबंधित दाव्याचा प्रचार केला जात आहे का असा प्रश्न पडतो. संबंधित ३ वर्षांची आकडेवारी विचारात घेता एकूण ५० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आल्याचे दिसते. तशाने सर्वच प्रश्न संपायला हवेत, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.





