Abhijit Dipke : “मंत्र्यांच्या श्वानांनाही यापेक्षा चांगल्या सुविधा”; सरकारी शाळांच्या दुरवस्थेवर दिपके यांची टीका
राजकारणासाठी आपण जात आणि समाजाचे झेंडे घेऊन घराबाहेर पडतो; त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या शाळांसाठीही आपण बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Abhijit Dipke – सरकारी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून तिथे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांपेक्षा मंत्र्यांच्या श्वानांना मिळणाऱ्या सुविधा अधिक चांगल्या आहेत, असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी गुरुवारी केला. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
सीजेपीने गेल्या आठवड्यात स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावातील एका जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिपके म्हणाले, शाळांच्या दयनीय अवस्थेसाठी लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना जबाबदार धरले पाहिजे, कारण अनेक शाळांमध्ये अजूनही योग्य वर्गखोल्या, बाके, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दादा भुसे यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम सुरू ठेवावे का, या प्रश्नावर ते म्हणाले, शाळांची अवस्था पाहता मला असे वाटते की शिक्षण मंत्र्यांनी या पदावर राहू नये. जर सरकारला सरकारी शाळांमध्ये सुधारणा करण्याची निकड समजून घ्यायची असेल, तर मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी स्वतःची मुले या शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवली पाहिजेत. अनेक वर्षे सत्तेत असूनही, सत्ताधारी पक्ष सरकारी शाळांमध्ये भरीव बदल घडवून आणण्यात अपयशी ठरला आहे, असा आरोप दिपके यांनी केला.
तोपर्यंत मते मागण्यासाठी येऊ नका.!
हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जेव्हा राजकीय नेते विद्यार्थ्यांसाठी काहीच करत नाहीत, तेव्हा लोकांनी त्यांना मते का द्यावीत? लोकांनी त्यांना मते यासाठी द्यायची का की त्यांनी फक्त हेलिकॉप्टरमधून फिरावे? आपल्या मुलांचे शिक्षण कोणत्या परिस्थितीत होत आहे, हे लोकांनी पाहिले पाहिजे.
या मंत्र्यांच्या श्वानांनाही यापेक्षा चांगल्या सुविधा मिळतात. लोकांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांवर शिक्षणासाठी काम करण्यास आणि त्यानंतरच मते मागण्यासाठी येण्यास भाग पाडले पाहिजे.
आपल्या गावात येणाऱ्या नेत्यांना, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, लोकांनी शिक्षणासाठी काम करण्यास सांगितले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शिक्षणासाठी काम करत नाही, तोपर्यंत मते मागण्यासाठी आमच्या दारात येऊ नका, असे त्यांना सांगा.
राजकारणासाठी आपण जात आणि समाजाचे झेंडे घेऊन घराबाहेर पडतो; त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या शाळांसाठीही आपण बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.





