Aaditya Thackeray : “इंग्रजी महत्त्वाची आहे, पण मराठी…”; आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले, एकदा पाहाच….

Aaditya Thackeray – महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलीच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे ती इंग्रजी. कारण ही जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा मग हिंदी असेल किंवा इतर कोणती हे शिकणे महत्त्वाचे आहे. कारण ज्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्यांची प्रगतीही जास्त होते.
आपल्याकडे सर्वांत कठीण परीक्षा कोणती असते तर ती यूपीएससीची. तुम्ही कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याकडे पाहा. त्यांना मातृभाषा येते इंग्रजी येते, हिंदी येते आणि ते ज्या ठिकाणी सेवेत असतात तेथील स्थानिक भाषाही येते, असे मत ठाकरेसेनेचे माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. त्यानंतर ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना भूमिका मांडत महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, या निर्णयाकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहायचे असेल तर योगायोग बघा.परवा ज्या भेटीगाठी झाल्या, एकमेकांना आधार देण्यासाठी असतील. एकमेकांना आयडिया देण्यासाठी असतील. यातून एकच दिसते, कदाचित असा डाव असू शकतो, बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे.
नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल, आम्ही मराठीचा विषय घेतो, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, दोघांचा फायदा लोक मरतील यात आपले काय. आपले तर नीट चालेल असा विचार असू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
…एकतरी भाषा व्यवस्थित येते का?
हे परिपत्रक ज्यांनी काढले आहे, त्या मंत्री महोदयांना देखील एकतरी भाषा व्यवस्थित येते का? असे म्हणत त्यांनी मंत्री दादा भुसेंना टोला लगावला. तसेच मी कोणाची टिंगल करत नाही, पण तुम्ही गणवेश देऊ शकत नाहीत आणि तिसरी भाषा सक्तीची करणार आहात.
अनेक ठिकाणी एकच शिक्षक असतात, त्या शिक्षकांवर किती भार पडणार हे लक्षात ठेवा. देशात आपण धर्मावर भांडत आहोत, जातीवर आणि आता शिक्षणात भाषा कोणती यावर भांडत आहोत, हे सगळं केंद्र सरकारमुळे झाले आहे.
जोपर्यंत ही पद्धत आपण बदलत नाही तोपर्यंत कठीण आहे. माझा भाषेला विरोध नाही. मात्र, ती कशी एक-एक करून शिकवता येईल याचा विचार करायला हवा, असेही ठाकरे यांनी म्हटले.





