Election News : राज्यात स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात? राज्य निवडणूक आयोग लागले कामाला

Election News – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगही कामाला लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
या निवडणूका तीन टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे. हे तीन ही टप्पे वेगवेगळे असतील अशी विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. त्याच बरोबर 30 जानेवारीपर्यंत निवडणूक पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी झाली आहे. त्यामुळे ही तयारी पाहाता राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार हे जवळपास निश्चित आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब झाला आहे. या निवडणुका घेतल्या जाव्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेकांनी धाव घेतली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी भूमीकाही न्यायालयाने घेतली.
या पार्श्वभूमीवर राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने मतदार यादींचा कार्यक्रम ही जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केलेला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.
या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद विभाग आणि पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे.
अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. निवडणूक विभाग मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जाणार आहे.





