Rahul Gandhi – मतदारयाद्या पडताळणीवरून (एसआयआर) कॉंग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपवरील टीकेचे सत्र कायम ठेवले. पडताळणी प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सहभागी काही बुथस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) विविध कारणांवरून मृत्यू झाला. त्यावरून कॉंग्रेसने टीकेची धार वाढवली. मतदारयाद्यांची पडताळणी कुठली सुधारणा नसून जबरदस्तीने लादलेली प्रक्रिया आहे, असे भाष्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. तर, ती प्रक्रिया नोटंबदी आणि करोना संकटकाळातील लॉकडाऊनची आठवण करून देणारी आहे, अशी उपरोधिक टिप्पणी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या मतदारयाद्यांची पडताळणी सुरू आहे. त्या प्रक्रियेवर कॉंग्रेस आणि बहुतांश विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. अशात आत्महत्या, हृदयविकाराचा झटका, दुर्घटना आदी कारणांमुळे बीएलओंना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर येत आहेत. बीएलओ म्हणून कार्य करणारे प्रामुख्याने सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कामाचा अतिताण येत असल्याचा आरोप होत आहे. अशात मागील १९ दिवसांत ६ राज्यांमध्ये १६ बीएलओंची जीवनयात्रा संपल्याचा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. संबंधित बातमीचा आधार घेऊन राहुल आणि खर्गे यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातून त्यांनी मतदारयाद्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने नमूद केलेल्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणजे त्या स्वच्छ करण्यासाठी प्रक्रिया राबवली जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. पडताळणीच्या नावाखाली देशभरात अनागोंदीसारखी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने वेगळीच व्यवस्था बनवली आहे. त्यामुळे नागरिकांना २२ वर्षे जुन्या मतदारयाद्यांमधील आपली नावे शोधण्यासाठी स्कॅन केलेली हजारों पाने धुंडाळावी लागतील. पात्र मतदाराने थकून हारावे आणि मतचोरी बिनदिक्कत चालू रहावी हा त्यामागील खरा उद्देश आहे. भारत जगासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर बनवतो. मात्र, निवडणूक आयोग आजही कागदांचा व्याप उभा करू पाहत आहे. उद्देश साफ असता; तर मतदारयाद्या डिजिटल, शोधण्यायोग्य आणि मशीन रिडेबल स्वरूपात उपलब्ध करता येऊ शकल्या असत्या. तसेच, घाईघाईने प्रक्रिया न राबवता निवडणूक आयोगाने योग्य अवधी देऊन ती मार्गी लावली असती, असे राहुल यांनी म्हटले. खर्गे यांनीही निवडणूक आयोगाबरोबरच भाजपवर निशाणा साधला. मतचोरीला आता जीवघेणे स्वरूप प्राप्त झाले आहे. कामाच्या अतिताणामुळे बीएलओंना आत्महत्या करणे भाग पडत आहे. चोरीने मिळालेली सत्तेची मलई खाण्यात भाजप व्यस्त आहे. तर, निवडणूक आयोग मूक प्रेक्षक बनून तमाशा पाहत आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.