मुंबई : मागच्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयाने एक मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावर खूनाचा (कलम 302) तसेच पुरावे नष्ट करण्याचा (कलम 218) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. या निकालानंतर राजू पाटील यांचे मामा एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे? पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजू पाटील याचा कोणताही संबंध नसतांना राजकीय विरोधकांनी त्याला या गुन्ह्यात गोवले होते, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तथापि, न्यायालयाने त्याच्या निर्दोषत्वावर आता शिक्कामोर्तब केल्याचे विरोधकांना चपराक बसली, असं वक्तव्य देखील एकनाथ खडसे यांनी केलंय. अभय कुरुंदकरला फाशी की जन्मठेप? API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कोर्टाने अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश पाटील या तिघांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने या दोघांना देखील शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अभय कुरुंदकर यांना फाशी की जन्मठेप यावर निर्णय येत्या 11 एप्रिल रोजी दुपारी ठाणे जिल्हा न्यायालयात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे. काय आहे नेमके अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण? अश्विनी बिद्रे 2005 मध्ये पोलिस दलात भरती झाली. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध सुरु झाले. अश्विनी आणि अभय दोघेही विवाहित होते आणि त्यांना आपापली कुटुंबं होती. पण अभयने अश्विनीला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनीने आपल्या पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे, जी तिच्या वडिलांसोबत राहते. यानंतर अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला. पण कुरुंदकरला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. कुरुंदकर त्याच्या पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नव्हता, तर अश्विनी लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. त्यामुळे त्याने अश्विनीची हत्या केली.