-माधव विद्वांस
गीतकार, नाटककार, संपादक, पत्रकार, राजकारणी, विद्याधर गोखले यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1924 रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे वडील विद्वान, अभ्यासू व कॉंग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. तत्कालीन विदर्भ हा मध्य प्रदेश सरकारचा भाग होता व त्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते.
अमरावतीमधील नाटककार स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी यांच्या लेखनाचा व विचारांचा विद्याधर यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे प्राथमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. वर्ष 1944 मध्ये ते मुंबई येथे आले व कुर्ल्याचे जनरल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये त्यांनी अध्यापन केले. नंतर पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे एका साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. याचवेळी त्यांच्यातील प्रतिभावान कवी व नाट्य लेखक जागा झाला. 1960 ते 1983 या कालावधीत त्यांनी सुमारे 18 नाटके लिहिली. तसेच 66 नाट्यगीतेही लिहिली. त्यांनी ज्यावेळी नाटक लिहिण्यास सुरुवात केली, त्यावेळी प्रेक्षकांचे संगीत नाटकाकडे थोडे दुर्लक्ष होऊ लागले होते. नाटक व नाट्यसंगीत या दोन्ही गोष्टींना त्यांनी संजीवनी दिली.
त्यांच्या नाट्यक्षेत्रातील पदार्पणात वसंत देसाई, छोटा गंधर्व, राम मराठे, प्रभाकर भालेराव, नीळकंठ अभ्यंकर, यशवंत देव यांसारख्या संगीतकारांची साथ मिळाली. कीर्ती शिलेदार, प्रसाद सावकार यांचा स्वरही त्यांच्या गीतांना मिळाला. “पंडितराज जगन्नाथ’, “सुवर्णतुला’, “मंदारमाला’, “जय जय गौरीशंकर’ व “मदनाची मंजिरी’ या पाच संगीत नाटकांच्या लेखनामुळे ते विशेष प्रसिद्धी पावले. रागदारीप्रधान शास्त्रीय संगीताबरोबर स्तोत्र, गझल, भावगीत, लावणी यांचाही वापर करून घेतला व त्यामुळे त्यांचे गीतलेखन परिपूर्ण झाले.”माय फेअर लेडी’वर आधारित, भारतीय वातावरणात ते कथानक मांडताना नायिकेचा सुरवंटातून फुलपाखरू हा प्रवास त्यांनी संगीतामध्ये खुलविला. तमासगीर नायिकेला शास्त्रीयसंगीत नाटकाची नायिका त्यांनी सुंदर रीतीने रंगविली होती.
वर्ष 1989 उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून गेले. त्याबाबतीत त्यांची कन्या शुभदा दादरकर यांनी सांगितलेली आठवण बोलकी आहे. शुभदा दादरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संगीत आणि कला अकादमीच्या प्राचार्यपदासाठी अर्ज केला होता. त्यांनी अण्णांना (विद्याधर गोखले) विचारले, “तुम्ही माझ्या या पदासाठी आयुक्तांना एक फोन कराल का?’ त्यावर अण्णा म्हणाले, “हे बघ, तुला माहीत आहे की, आजपर्यंत मी एका तत्त्वाने वागत आलो आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला तत्त्व सोडून वागायला लावू नकोस.’
त्यांची वर्ष 1993 मध्ये सातारा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजय गोखले हे विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा नि:स्पृह नाटककाराचे लखनौ येथे व्याख्यानांसाठी गेले असताना 26 सप्टेंबर 1996 रोजी निधन झाले.