-माधव विद्वांस
संगीत मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम गायिका व अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांची आज जयंती. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. त्यांचा जन्म 11 मे 1914 रोजी गोवा येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव दुर्गा केळकर होते. त्यांनी केवळ 13 व्या वर्षांच्या असताना गायिका म्हणून त्यांचे करियर सुरू केले. त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील आग्राघराण्यातील खदीम हुसेन खान आणि इनायत हुसेन खान तसेच पती भोळे यांच्याकडून संगीताचे धडे घेतले.
त्या संगीतनाट्य मंचावरील गायिका व अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. पूर्वी नाटकामधून स्त्री भूमिकाही पुरुषच करायचे मात्र श्रीमती ज्योत्सना भोळे यांनी मराठी नाटकात भूमिका करणे सुरू केले व पहिल्या स्त्रीनाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
विवाहानंतर 1933 साली त्यांच्या पतींनी “नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या नाट्यसंस्थेमार्फत ‘आंधळ्याची शाळा’ हे त्यांनी अभिनय केलेले पहिले नाटक होते. नाटकाचा प्रथम प्रयोग 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची (बिंबाची) भूमिका केली होती. त्यांच्याबरोबर या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. ‘आंधळ्यांची शाळा’हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ‘ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी 18 वर्षांच्या होत्या.
‘बोला अमृत बोला’ या गाण्याने रसिकांच्यावर विलक्षण मोहिनी घातली होती मो. ग. रांगणेकर यांनी लिहिलेले हे नाट्यगीत मा. कृष्णराव यांनी संगीतबद्ध केले व ज्योत्स्नाताईंनी ते आपल्या सुरेल आवाजात अभिनयासह ‘कुलवधू’ नाटकासाठी गायले. तसेच केशवराव भोळे यांनी संगीतबद्ध केलेले आला खुशीत् समिंदर हे कोळीगीत पण रसिकांना आवडले.
त्यांनी “अलंकार’ नाटकात वत्सलेची, “आराधना’त देवकीची, “आशीर्वाद’मधील सुमित्रा, एक होता म्हातारा’तील उमा, “कुलवधू’ मधील भानुती, “कोणे एके काळी’मधील कल्याणी, “धाकटी आई’मधील वीणा, “भूमिकन्या सीता’मधील सीता, “रंभा’तील सुगंधा, “राधामाई’मधील राधा तर ‘विद्याहरण’मधील देवयानी अशा अनेक नाटकांत अभिनय केला.
त्यांच्या आयुष्यातील महत्वाची घटना म्हणजे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे व शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केलेले “बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गायले. त्यांनी “आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे “महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या अध्यक्षा होत्या.
1999 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा “लता मंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे “बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र “तुची ज्योत्स्ना भोळे’हे प्रकाशित केले आहे. मराठी रंगभूमीवरीळ 30 वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यानिवृत्त झाल्या. 5 ऑगस्ट 2011 रोजी त्यांचे निधन झाले. ज्योत्स्ना भोळे यांना अभिवादन.