श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करून नेणारा डंपर श्रीरामपूर तालुक्यातील दिघी – चितळी रस्त्यावर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पकडला. या कारवाईत पोलिसांनी चार ब्रास वाळू आणि एक ढंपर, असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली आहे.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या पोलीस पथकाने चितळी-दिघी रोडवर टाटा कंपनीचा डंपर (एम एच 14 डीजे 1116) मधून गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू घेऊन जात असलेला डंपर अडवला. यावेळी पोलिसांनी डंपरचालक नंदू नारायण कोठुळे व डंपरचा मालक (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी डंपर पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
यात पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू व टाटा कंपनीचा डंपर (एमएच 14 बीजे 1116) असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
नंदू नारायण कोठुळे व डंपरमालक या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास सुभाष आंधळे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे हे करत आहेत.