Dumper Accident Threat: रावेतमध्ये ‘यमदूत’ सुसाट? अंतर्गत रस्त्यांवर भरधाव डंपरचे थैमान; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Dumper Accident Threat: स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही आणि स्पीड कॅमेरे लावण्याची नागरिकांची मागणी; वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रावेतकरांमध्ये तीव्र नाराजी.

Dumper Accident Threat – रावेत परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाळू, खडी, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे ट्रक व डंपर अंतर्गत रस्त्यांवरून मोठ्या संख्येने धावत आहेत. मात्र, ही अवजड वाहने अनेकदा वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी, शालेय विद्यार्थी,
ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळी शाळा आणि कार्यालयांची वेळ तसेच संध्याकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असताना भरधाव ट्रक व डंपरची ये-जा सुरू असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक अंतर्गत रस्ते अरुंद असून पादचारी मार्गांची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, काही वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करत नाहीत. वळणांवर, चौकांमध्ये तसेच निवासी भागातून जातानाही वेग कमी केला जात नसल्याने लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे. नागरिकांनी संबंधित बांधकाम व्यावसायिक, वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, नियमित तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
– अंतर्गत रस्त्यांवर ट्रक व डंपरच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित वाहतूक तपासणी करावी.
– शाळा आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळेत अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत.
– धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि इशारा फलक उभारावेत.
– प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही आणि स्पीड कॅमेरे बसवावेत.
– नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी.
– बांधकाम व्यावसायिकांनी वाहनचालकांना सुरक्षित वाहनचालनाबाबत सक्त सूचना द्याव्यात.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रावेत परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले उभी राहत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अंतर्गत रस्त्यांवर भरधाव अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून होत आहे.






