Pune District : वीर धरणातून नीरा नदीत २४ हजार क्युसेक विसर्ग
Pune District : नीरा धरण प्रणालीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी (दि. 22) रात्री 11 वाजता धरणातून 4,637 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता.

परिंचे : नीरा धरण प्रणालीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी दोन वाजता वीर धरणाचे पाच वक्र दरवाजे चार फूट उचलून नीरा नदीपात्रात 23 हजार 185 क्युसेक, तर अतीवाहकाद्वारे 1,100 क्युसेक असा एकूण 24 हजार 285 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,550 क्युसेक तर डाव्या कालव्यातून 827 क्युसेक पाणीही सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर आणि धरणातील आवक लक्षात घेऊन विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी राहुल मिसाळ यांनी दिली. नीरा धरण प्रणालीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी (दि. 22) रात्री 11 वाजता धरणातून 4,637 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता विसर्ग 15 हजार क्युसेक करण्यात आला. धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत राहिल्याने दुपारी दोन वाजता पुन्हा विसर्ग वाढवून 24 हजार 285 क्युसेक करण्यात आला.
धरणाच्या एकूण नऊ दरवाजांपैकी पाच दरवाजे चार फूट उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शाखा अधिकारी लक्ष्मण सुद्रिक, सुनील कुंभार, संभाजी शेंडगे, सचिन धुमाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.
भाटघर-नीरा देवघरची आवक अद्याप सुरू नाही
धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, नीरा धरण प्रणालीतील भाटघर आणि नीरा देवघर धरणांतून अद्याप वीर धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. मात्र, गुंजवणी धरणातून 250 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कानंदी, शिवगंगा, पूर्णगंगा नद्या आणि विविध ओढे-नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकार्यांसह नदीकाठच्या तालुक्यांतील तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





