मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज ते पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. आज सुप्रिम कोर्टात सुनावनी झाली त्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत काही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी आज आढावा बैठकीचे आयोजन केले होते मात्र, अचानक त्यांना दिल्लीवरून बोलावणे आल्याने ते तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले. हा दौरा पूर्वनियोजित नव्हता त्यामुळे त्यांचा आजचा दौरा विशेष महत्वाचा मानला जात आहे.
एक महिन्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडेला आहे. मंत्रिमंडळात कोणा-कोणाचा समावेश असावा, याबाबतही ते पक्षश्रेष्ठींची चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आजचे सर्व बैठका आणि दौरे रद्द केले आहेत. त्यांना थकवा जाणवत असल्याने डाॅक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
15 ऑगस्ट आधी होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी?
राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार केंव्हा होणार याबाबत रोज नवीन तारखा मिळत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळाचा विस्तार नक्की होणार, असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. अमृत महोत्सवी झेंडावंदन असल्याने त्याआधी विस्तार करावाच लागेल असे त्यांनी सांगितले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार हे कोणाला माहिती नाही. मात्र एक नक्की आहे की, 15 ऑगस्टच्या आधी हा शपथविधी केलाच पाहीजे. तो करावाच लागेल. कारण अमृतमहोत्सवी वर्षाचे हे झेंडावंदन आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या अगोदर हा शपथविधी निश्चितपणे होईल याबाबत शंका नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.