Anil Deshmukh On Devendra Fadnavis : ‘फडणवीसांच्या राजकारणामुळे विकासकामे प्रलंबित’; अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

Anil Deshmukh On Devendra Fadnavis – देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. तसेच राज्याचेउपमुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी अनेक विकास प्रकल्पांच्या फाईलवर सही करत नाही. विविध योजनांच्या निधीसाठी आम्ही सातत्याने मागणी करतो आहे.
पण काटोल-नरखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) मतदारसंघ असल्याने राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
या आरोपानंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. नागपूर येथे अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप आणि हरियाणाच्या निकालावरही भाष्य केले.
अनिल देशमुख म्हणाले, भाजपच्या आमदाराला जास्त निधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला कमी निधी असे चालणार नाही. सर्वांना समान निधी मिळाला पाहिजे.
जर आम्हाला निधी मिळाला नाही, तर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणू तसेच असून याविषयी न्यायालयातही दाद मागू. सामान्यांचा विकास कामांसाठी आमदारांना पैसे मिळालेच पाहिजे. यात कोणताही भेदभाव होता कामा नये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
अनिल देशमुखांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केले. जागावाटपाबाबत दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. पण विदर्भातील अनेक जागांचा निर्णय अद्याप बाकी आहे.
दसऱ्यानंतर आम्ही बैठक घेऊन याबाबत चर्चा करू. सक्षम उमेदवार बघून या जागांबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निर्णय नेते घेतील. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय १० मिनिटांत घेतला जाईल, असेही ते म्हणाले.





