“मराठा आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीसांना अडचणीत आणण्याचा दिल्लीतून प्रयत्न”; अमित शाहांचं नाव घेत राऊतांच मोठं विधान

Maratha Reservation | मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनसाठी हजारो आंदोलक मुंबई दाखल झाले आहेत.
मात्र काही आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्याने मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत मनोज जरांगेंसह आंदोलनकर्त्यांना खडसावले होते.
दरम्यान, अश्यातच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या या विधामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी मंत्रिमंडळातील काही व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
“या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करत असतील न्यायालयाला हे सुद्धा गांभीर्याने पाहावे लागेल. फडणवीसांच्या मित्र पक्षामधील काही नेते आहेत. नाव कशाला घेतलं पाहिजे अजिबात गरज नाही, नाव घ्यायची.
अमित शहाांनी पाहिलं पाहिजे कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय या व्यक्ती काही करू शकत नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपमधून एक मोठा गट प्रयत्न करत आहे,” असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “गावागावात भीमा कोरेगावसारखया दंगली व्हाव्या, आंदोलन व्हावे, संघर्ष व्हावा आणि हे राज्य अस्थिर व्हावा यासाठी मंत्रीमंडळातल्या काही शक्ती पडद्याआडून काम करत आहेत, हे फडणवीस यांना माहित आहे.
फडणवीस यांनी शिवसेना फोडून, आम्हाला फोडून आपल्या घरामध्येच आग लावली आहे. त्यांना आता कळेल की त्यांनी किती मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवला आहे आणि स्वतःच्या बुडाला आग लावून घेतली आहे,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
कोर्टाच्या आजच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे
1) तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश.
2) सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट
3) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही.
4) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत.
5) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार.
मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली?
1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही.
2) 5 हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण 500 लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही.
3) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली.
4) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय.





