रेमल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तटरक्षक दलाने यशस्वीपणे केला सामना; मोठी जीवितहानी टळली

Cyclone Remal: – रेमल या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तटरक्षक दलाने यशस्वीपणे सामना केला आहे. सुरुवातीला २२ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, या वादळाचे अत्यंत वेगाने अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यानंतर २६ ते २७ मे च्या मध्यरात्री या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडक दिली.
चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर लगेच भारताच्या ईशान्य विभाग तटरक्षक क्षेत्रीय मुख्यालयाने प्रारंभिक उपाययोजना सुरू केल्या होत्या. त्यांनी विविध केंद्रीय आणि राज्य यंत्रणांशी समन्वय राखत काम केले, त्यामुळेच या समुद्री क्षेत्रात कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीच्या घटना टाळण्यात यश आले.
चक्रीवादळ धडकण्याची शक्यता गृहीत धरून, वादळाच्या मार्गाचे सातत्याने निरीक्षण करत, सागरी मार्गाने जात असलेल्या व्यापारी ताफ्यांना सुरक्षीत वळणाने मार्गक्रमण करता यावे यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने जहाजे, विमाने आणि सागरी किनारपट्टी देखरेख व्यवस्था तैनात केली होती.
यासोबतच भारतीय तटरक्षक दलाच्या हल्दिया आणि पारादीप येथील रिमोट नियंत्रण केंद्रांवरून मच्छीमार बोटी आणि वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना सातत्याने आणि वेळोवेळी सतर्कतेचे इशारेही देण्यात आले.
चक्रीवादळाने प्रत्यक्षात धडक दिल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या वरद या जहाजने तातडीने पारादीप इथून निघून चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. यासोबतच, भारतीय तटरक्षक दलाच्या दोन डॉर्नियर विमानांनीदेखील भुवनेश्वर इथून उड्डाण करत, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडच्या क्षेत्राची व्यापक पाहणी केली.





