“जनता गोवरने परेशान.. मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांच्या शय्येवर !” सामनातून सरकारवर निशाणा

मुंबई – “कोरोना संकटकाळात राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही. आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे”. असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.
“मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?” असा सूचक इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
गुजरात निवडणुकीवरही भाष्य
“आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते कॉंगेस आणि राहुल गांधींवर. आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील संकट वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर कोरोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते”.असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.





