मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पितात का? उदयनराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले अवमानबाबत त्यांना कळायला हवं..

Chhatrapati Udayanraje | आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे साजरी केली जात आहे. येथील समाधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी खासदार उदयनराजे वढू बुद्रुक येथे आले होते. अभिवादन केल्यानंतर त्यांनी महापुरुषांवर सातत्याने होणाऱ्या अपमानकारक विधानांवर सरकारला धारेववर धरत सरकावर सडकून टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचे सगळे ऐकलं पाहिजे, अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवे. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पितात का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलले जात आहे. यासंदर्भात शासनाने कठोर कायदा करत मोकोका प्रमाणे कायदा आणवा, तसेच अजामीन पात्र शिक्षा आणि किमान दहा वर्षांची शिक्षा व्हायला पाहिजे. अशी मागणी उदयनराजे यांनी केली. अलिकडे विधीमंडळाचे अधिवेशन पार पडले. यात का कायदा करण्यात आला नाही? महापुरुषांचा अपमान व्हावा, असे सर्व लोकप्रतिनिधींना वाटतं का? असा सवाल देखील उदयराजे यांनी उपस्थित केला.
गृहमंत्री अमित शहांशी घेतली भेट
नुकतीच खासदार उदयराजे भोसले यांनी यासंदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा, अशा प्रवृत्तींबाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा किमान १० वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देत उदयराजे यांनी केली आहे.





