छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस नेत्यांवर पाळत ठेवली जातेय; भूपेश बघेल यांचा आरोप

रायपूर : छत्तीसगडमध्ये पेगासस हेरगिरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पंजाब काँग्रेसचे प्रभारी भूपेश बघेल यांनी भाजप सरकारवर त्यांची हेरगिरी आणि फोन टॅपिंगचे गंभीर आरोप केले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, बघेल यांनी दावा केला की त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आहे. एवढेच नाही तर तीन दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणेचे लोकही चौकशीसाठी त्याच्या बंगल्यात आले होते. याआधीही सरकारने आमचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांची हेरगिरी आणि फोन टॅपिंग केले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
जेंव्हापासून त्यांना पंजाब काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे, तेव्हापासून त्यांच्यावर हेरगिरी केली जात आहे. गुप्तचर अधिकारी त्यांच्या घरी किती लोक राहतात आणि कोण त्यांना भेटायला येते हे जाणून घेण्यासाठी येत आहेत असे बघेल म्हणाले. दरम्यान, सरकारवर विरोधी नेत्यांची हेरगिरी केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सरकारवर इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससद्वारे फोन टॅपिंगचा आरोप केला होता.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगड काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांच्या बंगल्याबाहेर एका पोलिस अधिकाऱ्याला संशयास्पदरित्या हेरगिरी करताना पकडण्यात आले. बैज यांनी सरकारवर काँग्रेस नेत्यांची हेरगिरी करण्याचा आणि त्यांचे फोन पाळत ठेवण्याचा आरोपही केला आहे. या मुद्द्यावरून छत्तीसगड विधानसभेत काँग्रेस आमदारांनीही गोंधळ घातला होता.
हेरगिरीच्या आरोपांवरून विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर, भाजपने प्रत्युत्तर दिले की काँग्रेसच्या राजवटीत विरोधी नेत्यांची हेरगिरी केली जात होती आणि ही त्यांची जुनी परंपरा आहे. आमचे सरकार कोणत्याही विरोधी नेत्याची हेरगिरी करत नाही. बघेल म्हणाले की पक्षाने त्यांना पंजाब निवडणूक जिंकण्याची जबाबदारी दिली आहे आणि म्हणूनच त्यांची हेरगिरी वाढवली आहे.
ते लवकरच दिल्लीला जातील आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देतील. एकंदरीत, हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चांगलाच तापला आहे आणि येत्या काळात हा वाद आणखी वाढू शकतो.





